सुंदरलाल पटवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुंदरलाल पटवा (जन्म : ११ नोव्हेंबर, इ.स. १९२४; - भोपाळ, २८ डिसेंबर, इ.स. २०१६) हे भारतीय जनता पक्षाचे नेते, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीभारताच्या केंद्र सरकारमधील माजी मंत्री होते.

सुंदरलाल पटवा यांच्या कारकिर्दीची सुरुवात जनसंघापासून झाली होती. मध्य प्रदेश राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या सरकारमध्ये ते सहभागी होते. त्या राज्याच्या त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाचा त्यांचा कार्यकाळ २० जानेवारी १९८० ते १७ फेब्रुवारी १९८० पर्यंत होता. तर दुसरा काळ ५ मार्च १९९० पासून १५ डिसेंबर १९९२ पर्यंत होता. १९९२ साली बाबरी मशीद पडल्यानंतर मध्य प्रदेशात राष्ट्रपती राजवट सुरू करण्यात आली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आली.

१९९७ मध्ये छिंदवाडा पोटनिवडणुकीत सुंदरलाल पटवा हे काँग्रेसचे नेते कमलनाथ यांना त्यांच्या मतदारसंघात पराभवाची धूळ चारून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.. मात्र १९९८ च्या निवडणुकीत त्यांना कमलनाथांनी हरवले. त्यानंतर ते १९९९ साली ते हुशंगाबाद लोकसभा मतदारसंघांमधून लोकसभेवर निवडून गेले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले.

मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील कुकडेश्वर हे पटवांचे मूळ गाव होते. ते विधुर होते आणि त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांचा पुतण्या सुरेंद्र पटवा हा मध्य प्रदेश राज्याच्या मंत्रिमंडळात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री आहे (इ.स. २०१६).