शेषराव मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. डॉ. शेषराव मोरे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९४८) हे वैचारिक लिखाण करण्यारे एक मराठी लेखक आणि वक्ते आहेत. ते व्यवसायाने अभियंता आहेत. औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते कायद्याचे पदवीधरही आहेत.

त्यांच्यावर प्रा. नरहर कुरूंदकर यांचा प्रभाव आहे. नांदेडला अभियांत्रिकी शिकत असताना ते कुरूंदकर यांच्या वर्गात बसायचे.

लेखनासाठी केलेला अभ्यास[संपादन]

आपल्या पुस्तकांमधूनमोरे यांनी भारतावरील इस्लाम धर्माच्या प्रभावाचा अभ्यास केला आहे. १९९१पासून त्यांनी इस्लामचा सर्वांगीण केला. रोज सात-आठ तास अभ्यास करूनही वेळ पुरत नसल्याने त्यांनी अखेर औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी कॉलेजातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. देशभर भ्रमंती करून अभ्यासक, मौलवी यांच्या भेटी घेतल्या आणि हजारो पुस्तके अभ्यासली. यातून 'मुस्लिम मनाचा शोध', 'प्रेषितानंतरचे चार आदर्श खलिफा' ही पुस्तके लिहीली. मोरे यांनी रूढार्थाने वाचकानुनय न करता ही पुस्तके लिहिली आहेत. मोरे यांचे लेखन अनेक मराठी नियतकालिकात सातत्याने प्रकाशित होत असते.

सावरकरांविषयीचे लेखन[संपादन]

सावरकरांचा व्यासंग हे शेषराव मोरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अभिन्न अंग आहे. सावरकरांचे जीवन हा मोरे यांच्या लिखाणाचा आवडता विषय. त्यामुळे प्रारंभी 'सावरकरांचा बुद्धिवाद', 'सावरकरांचे समाजकारण', 'सत्य आणि विपर्यास' या पुस्तकांतून सावरकरांच्या मौलिक विचारांची परखड मीमांसा त्यांनी केली.[१]

शेषराव मोरे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • १८५७चा जिहाद (अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन)
  • अप्रिय पण (अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन)
  • Islam - Maker of the Muslim Mind
  • काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला (राजहंस प्रकाशन) : या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेकडून पुरस्कार मिळाला आहे.
  • काश्मीर एक शापित नंदनवन (राजहंस प्रकाशन)
  • गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी
  • प्रेषितानंतरचे पहिले चार आदर्श खलिफा (राजहंस प्रकाशन)
  • मुस्लिम मनाचा शोध
  • विचारकलह (अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन) भाग १, २
  • शासनपुरस्कृत मनुवादी : पांडुरंगशास्त्री आठवले
  • (सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास
  • सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन)
  • सावरकरांचे समाजकारण
  • सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • मृत्युंजय प्रतिष्ठानचा मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य पुरस्कार (२०१४)
  • ५-६ सप्टेंबर २०१५ या काळात पोर्ट ब्लेअर (अंदमान) येथे झालेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा वाग्‌यज्ञे पुरस्कार (२६-१२-२०१५)
  • सावरकर स्मृती प्रतिष्ठानचा साहस पुरस्कार (१६-७-२०१६)
  • मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (१६-३-२०१४)
  • लोकसंवाद-२०१६चा जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१६)
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कृष्ण मुकुंद पुरस्कार (२७-४-२०१४)
  1. ^ "वीर सावरकर आज चुनाव लड़ते तो कभी जीत नहीं पाते: शेषराव मोरे". दैनिक भास्कर. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.