वल्लभगड किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वल्लभगड या पानावरून पुनर्निर्देशित)
वल्लभगड
नाव वल्लभगड
उंची १८५० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण बेळगाव, कर्नाटक
जवळचे गाव वल्लभगड, संकेश्वर बेळगाव,
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


वल्लभगड हा किल्ला भारताच्या कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यात संकेश्वर शहरानजीक आहे. कोल्हापूरहून बेळगावकडे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाने जाताना संकेश्वरच्या अलीकडे सुमारे ३ कि.मी. अंतरावर डावीकडे हा गड दिसतो.

ऐतिहासिक महत्त्व[संपादन]

छ्त्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज व कोकणातील जंजिऱ्याचे हबशी यांच्या फौजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकणच्या व गोव्याच्या सरहद्दीजवळ असणा‍ऱ्या अनेक किल्ल्यांचा खुबीने उपयोग करून घेतला होता. चंदगड तालुक्यात असणारा कलानंदीगड व महिपाळगड, बेळगांव तालुक्यातील राजहंसगड, खानापूर तालुक्यातील भीमगड, पारगड, गडहिंग्लज तालुक्यातील सामनगड, हिक्केरी तालुक्यातील वल्लभगड, आणि सौंदत्ती तालुक्यातील पारसगड या आठ गडांचा उपयोग छ्त्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता. या प्रत्येक गडावरून दुसरा गड दृष्टिपथात येत असल्याने एका गडावरून दुसऱ्या गडावर सांकेतिक संदेश देणे सहज शक्य होत असे.[१]

रचना[संपादन]

वल्लभगडावर मरगूबाई देवीचे मंदिर, हनुमान मंदिर व शिद्राया मंदिर आहे. गडाला प्रशस्त प्रवेशद्वार आहे. गडाच्या माथ्यावर चाळीस फूट खोलीची विहीर आहे. विहिरीमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडे असलेला दुसरा छोटा भुयारी मार्ग किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या शिद्राया मंदिराकडे गेला आहे, असा लोकांचा समज आहे. गडाच्या माथ्यावर बेळगाव जिल्ह्याची पोलीस यंत्रणा उभारलेली आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी[संपादन]

संकेश्वर,बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वल्लभगड किल्ल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला इतिहास आहे.

प्राचीन काळापासून भारतीय इतिहासाचे अवलोकन केल्यास या विशाल देशात अनेक राजसत्ता उदयाला येऊन आपल्या कोणत्याना कोणत्या माध्यमातून कायमचा ठसा उमटवून गेल्याचे दिसून येते. या राजसत्ता टिकवून ठेवण्यासाठी किल्ले, गडकोट, दुर्ग यांचा सिंहाचा वाटा आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागातील महाराष्ट्र सीमालगतच्या बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर जवळील वल्लभगड त्याचेच एक उदाहरण आहे.[२]

राजकीय सत्तेच्या संरक्षणासाठी या किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे किल्ले, गड, दुर्ग भारतभर विखुरलेले दिसतात. संकेश्वर जवळील वल्लभगड हा अतिप्राचीन गडांपैकी एक आहे. या किल्ल्याचा उपयोग छ्त्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याकडून पोर्तुगिजांकडे व कोकणातील जंजिऱ्याचे हबशांच्या फौजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण व गोवा सरहद्दीजवळ असणाऱ्या अनेक किल्ल्यांचा खुबीने उपयोग करून घेतला होता. चंदगड तालुक्यात असणारा कलानंदीगड व महिपाळगड, बेळगांव तालुक्यातील राजहंसगड, खानापूर तालुक्यातील भीमगड, पारगड, गडहिंग्लज तालुक्यातील सामनगड, संकेश्वर जवळील वल्लभगड, आणि सौंदती तालुक्यातील पारसगड या आठ गडांचा उपयोग छ्त्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता. या प्रत्येक गडावरून दुसरा गड दृष्टिपथात येत असल्याने एका गडावरून दुसऱ्या गडावर सांकेतिक संदेश देणे सहज शक्य होत असे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या वल्लभगडाला त्याकाळात अत्यंत महत्त्व होते. दख्खनवर स्वारी करण्यास शिवाजी महाराज ज्यावेळी येथून गेले. त्यावेळी उठलेल्या त्यांच्या कृष्णा घोडीच्या पाऊलखुणा त्या आठवणींना उजाळा देतात. गडाच्या पायथ्यापासून किल्यापर्यंतचे अंतर एक कि.मी. असून हा किल्ला सुमारे १८५० फूट उंचीवर आहे.[३]

कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच वल्लभगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. सन १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख होते. या गडावर ७५ शिलेदार होते, व त्यांचे वंशज वल्लभगडावर आजही आहेत. साताऱ्याचे छत्रपती शाहू महराज यांनी या वल्लभगडाची पुनर्बांधणी केली.. सन १६८८ मध्ये वल्लभगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ मध्ये हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला. या नंतर ह्या किल्ल्याचे अधिपती कोल्हापूरचे राजे होते. त्यानंतर १४ मे १७५३ रोजी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी राज्यांनी सदाशिवरावभाऊ पेशवे यांना वल्लभगड, भीमगड, पारगड व कलानिधीगड हे किले जहागीर म्हणून दिले, १८४४ रोजी वल्लभगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा गड काही काळ निपाणीकर तर काही काळ वंटमुरी देसाई यांच्या ताब्यात गेला. कोल्हापूर हे संस्थान इंग्रजांच्या ताब्यात गेले असता त्यावेळी हा गड पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावर पाहण्याची ठिकाणे[संपादन]

१) गडदेवी मरगूबाईचे देऊळ

२) शिवाजीच्या काळातील हनुमान मंदिर

३) पेशवेकालीन महादेव मंदिर

४) सिद्धेश्वर मंदिर

५) शिवाजीच्या काळातील विहीर

६) पेशवेकालीन हरिद्रादेवी मंदिर (किल्याच्या पायथ्याला पूर्वेला वल्लभगड गावात हे मंदिर आहे)

टीप :' दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे वल्लभगडावर दुर्गसंवर्धन मोहिमा राबविल्या जातात.[४]

बाह्य दुवे[संपादन]

  • "वल्लभगड.कॉम - वल्लभगडाविषयी माहिती".

संदर्भ[संपादन]

  1. ^ "वल्लभगड". DURGBHARARI.COM (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-04-07. 2019-06-11 रोजी पाहिले.
  2. ^ "अनवट किल्ले १४: खोल खोल पाणी , वल्लभगड, हरगापुर ( Vallabhgad, Haragapur) आणि गंधर्वगड (Gandharvgad ) | मिसळपाव". www.misalpav.com. 2019-06-11 रोजी पाहिले.
  3. ^ "वल्लभगड - Vallabhgad". wikimapia.org (हिंदी भाषेत). 2019-06-11 रोजी पाहिले.
  4. ^ "वल्लभगड | दुर्गवीर" (इंग्रजी भाषेत). 2019-06-11 रोजी पाहिले.[permanent dead link]