मुरारबाजी देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुरारबाजी देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - - १६ मे, १६६५)[१][२] हे मराठा सैन्यातील वीर होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे, १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांना वीरमरण आले.

सैनिकी कारकीर्द[संपादन]

जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी झडलेल्या संघर्षात श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजींच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले.

स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्यांच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले, त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजांसोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने इ.स. १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजींनी गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थितीमधेदेखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी पुरंदर फार शर्थीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजींचा या लढाईत अंत झाला.[ संदर्भ हवा ]

समाधी[संपादन]

तब्बल दिड महिने पुरंदर लढता ठेवून ११ जून, १६६५[३][४] दिलेरखानाचा बाण लागुन मुरारबाजी पुरंदरी पडले. त्यांची समाधी महाड जवळ पिंपळ डोह या गावात आहे. पिंपळ डोह येथील सोमेश्वर मंदिरासमोरील मुरारबाजींच्या भग्न समाधीची स्थान निश्चिती कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉ. सचिन पोवार यांनी दि. २६ मार्च २०१८ रोजी केली व किंजळोली ग्रामस्थाकडून या समाधीच्या जीर्णोद्धरासाठी ठराव मंजूर करून घेतला.[ संदर्भ हवा ]

स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मुरारबाजींच्या पराक्रमातून उतराई होण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेमार्फत या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]

अखंड महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींच्या लोकवर्गणीतून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आले व २२ मे २०२२ रोजी त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. या सोबतच मुरारबाजी देशपांडे स्मारकाशेजारी १११ फूट उंचीचा भगवा ध्वज ही उभारण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]


  1. ^ Panday, Dr. narendra kumar (2017-09-15). "डॉ. श्रीकृष्ण सिंह, कांग्रेस तथा भारत सरकार अध्नियम 1935 : एक पुनरावलोकन". IJOHMN (International Journal online of Humanities). 2 (2). doi:10.24113/ijohmn.v2i2.21. ISSN 2395-5155.
  2. ^ Powar, Dr. sachin (Feb 2016). Shivchatrpatinche Shiledar. pune: Continental publication. pp. page no. 87, 90, 91.CS1 maint: extra text (link)
  3. ^ Panday, Dr. narendra kumar (2017-09-15). "डॉ. श्रीकृष्ण सिंह, कांग्रेस तथा भारत सरकार अध्नियम 1935 : एक पुनरावलोकन". IJOHMN (International Journal online of Humanities). 2 (2). doi:10.24113/ijohmn.v2i2.21. ISSN 2395-5155.
  4. ^ Powar, Dr. Sachin (Feb 2016). Shivchatrapatinche Shiledar. Pune: Continental Publication Pune. pp. page no 87, 90, 91.CS1 maint: extra text (link)