मराठी चित्रपटांचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धुंडिराज गोविंद फाळके - भारतीय सिनेमाचे जनक

सुरुवातीपासूनच धंदा म्हणून आणि कला म्हणूनही भारतीय चित्रपट व्यवसायाचा जो विकास झाला, त्यात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे. १८९५ च्या जुलैमध्ये लुमिअरे बंधूंनी तयार केलेल्या सिनेमाचा पहिला खेळ मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये झाला. १९१२ मध्ये मराठी चित्रपट 'पुंडलीक'चे चित्रीकरण याच शहरी झाले. दादासाहेब फाळके - भारतीय सिनेमाचे जनक - यांनी राजा हरिश्चंद्र या, भारतीय सिनेइतिहासातील पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथेच केले. १९३१ साली बोलक्या चित्रपटाचे आगमन होईपर्यंत मुंबईच भारतीय सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, पण तिच्याबरोबरच पुणे, खडकी, कोल्हापूर, नाशिक या गावीही चित्रीकरणाचे काम चालू होते. कोल्हापूरला बाबूराव पेंटर यांच्या उत्कृष्ट `सेट्स‌' मुळे चित्रीकरणाचे एका श्रेष्ठ कलेत रूपांतर झाले. त्यांचा सैरंध्री हा एतद्‍देशीय चित्रपटकलेतील एक लक्षणीय टप्पा आहे.

विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मुंबईतील चित्रपट व्यवसायाची भरभराट झाली. अनेक चित्रपट कंपन्या अस्तित्वात आल्या. पौराणिक कथांसारख्या विषयांबरोबरच मराठ्यांच्या इतिहासातील घटनाप्रसंग, तसेच रोजच्या जीवनातील समस्या हे विषयही चित्रपटांच्या कथानकांसाठी निवडले गेले. या कालातील दोन सर्वात उल्लेखनीय चित्रपट म्हणजे महाराष्ट्र फिल्म कंपनीचा ऐतिहासिक चित्रपट सिंहगड (१९२३) आणि सामाजिक चित्रपट सावकारी पाश (१९२५). या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन बाबूराव पेंटर यांचे आहे. 'सिंहगड'मध्ये तानाजीच्या आणि शिवाजी महाराज यांच्या इतर शूर शिपायांच्या देशभक्तीच्या कथेचे चित्रण आहे. तर 'सावकारी पाश'मध्ये गरीब मराठी शेतकऱ्यांच्या सावकाराकडून होणाऱ्या पिळवणुकीचे. हा चित्रपट सत्यजित राय यांच्या 'पाथेर पांचाली'च्या चाळीस वर्षे आधी काढला गेला असून त्यातील तत्कालीन परिस्थितीचे चित्रीकरण हृदयाला भिडणारे आहे. या चित्रपटाला भारतातील पहिला वास्तव चित्रपट म्हणता येईल. यातील तरुण शेतकऱ्याची भूमिका करणारे व्ही. शांताराम पुढे एक श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी संत तुकाराम, शेजारी बाबूराव पेंटर यांनी आणखी दोन ऐतिहासिक मूकपटांची निर्मिती केली. नेताजी पालकर (१९२८) आणि उदयकाल (१९३०). या दुसऱ्या चित्रपटाचे मूळ नाव स्वराज्य-तोरण होते. पण त्या काळच्या सेन्सॉरने त्यास हरकत घेतल्यावरून ते बदलून उदयकाल असे ठेवण्यात आले. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तारुण्यातील धाडसी मोहिमांची कथा दाखवण्यात आली होती.

मराठी चित्रपटांचे आठवड्यांचे विक्रम[संपादन]

चित्रपटाचे नाव आठवडे चित्रपटगृह
सांगत्ये ऐका (१९५९) १३१ विजयानंद (पुणे)
पिंजरा (१९७२) >५० प्लाझा (मुंबई)
पिंजरा २५ सेंट्रल (मुंबई)
संत तुकाराम ५२ वसंत (पुणे)
माहेरची साडी (१९९१) १२८ प्रभात (पुणे)
पाटलांची चंची ५० प्रभात (पुणे)
पुढचं पाऊल २५
सोंगाड्या २५ पुणे
सोंगाड्या ३७ मुंबई
आरोही (२०१२) >२५ सिनेमॅक्स (मुंबई)
बिनधास्त (१९९९) २५ प्लाझा (मुंबई)
श्यामसुंदर २५
नवरा माझा नवसाचा २५ सिटीप्राईड (पुणे)
नटरंग >२५ शाहू (कोल्हापूर)
माहेरची साडी (१९९१) ७० मुंबई
लेक चालली सासरला २५


संदर्भ आणि नोंदी[संपादन]