मराठा साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठा साम्राज्य, हिंदवी स्वराज्य, हिंदू पत पातशाही


[[चित्र:
The highest point of expansion of the Maratha Empire.
Maratha Empire
|250 px]]
इ.स. १६४५ - इ.स. १८१८
राजधानी राजगड, रायगड, जिंजी, सातारा, कोल्हापूर
राजे

भोसले घराणे
इ.स. १६७४ - १६८०: छत्रपती शिवाजी महाराज
इ.स. १६८१ - १६८९: छत्रपती संभाजी महाराज
इ.स. १६८९ - १७००: छत्रपती राजाराम महाराज
इ.स. १७०० - १७०७: छत्रपती महाराणी ताराबाई
इ.स. १७०७ - १७४९: छत्रपती सम्राट थोरले शाहू महाराज
इ.स. १७४९-१७७७: रामराजे छत्रपती
इ.स. १७७७-१८०८: छत्रपती शाहू दुसरे
इ.स. १८०८-१८१८: छत्रपती प्रतापसिंह भोसले

आणि त्यानंतर ब्रिटिश भारतात इ.स. १८१८- १९४७ ग्वालियर, इंदोर, बडोदा, धार, कोल्हापूर, अकल्लकोट, औंध, बांदा येथे स्वतंत्र मराठा संस्थानिकांनी राज्य केल. आणि स्वातंत्र्यानंतर आपली संस्थाने भारतात विलीन केली.
भाषा मराठी, संस्कृत
क्षेत्रफळ २५,००,००० वर्ग किमी
लोकसंख्या १७ कोटी
चलने होन, मुद्रा, रुपया, पैसा,शिवराई
मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज

मराठा साम्राज्य इ.स. १६‌‌‌‌‌‌३० ते इ.स. १९४७ दरम्यान भारतातील एक साम्राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. या साम्राज्याची अधिकृत भाषा मराठी होती, तसेच याला हिंदवी स्वराज्य असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी त्याआधी तंजावुर जिंकले होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ, व्यंकोजी राव उर्फ ​​एकोजी 1 यांना मिळाले होते आणि ते राज्य, तंजावुरचे मराठा राज्य म्हणून ओळखले जात होते. बंगलोर (बॅंगलोर) विजयनगर साम्राज्य जे एक जहागिरदार, केम्पे गौड़ा 1 यांचेद्वारे 1537 मध्ये स्थापित केले गेले होते, त्यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती, त्याला 1638 मध्ये त्यांच्या उपसेनापती, शाहजी भोसले यांच्यासोबत रानादुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली एक बड़ी आदिलशाही बीजापुर सेना द्वारे बेंगलोरवर कब्जा केला गेला होता, ज्यांनी केंम्पे गौड़ा 3 यांना पराजित केले होते आणि बेंगलोरचे शाहजी यांना जहागिर (संपत्ती) च्या स्वरूपात बहाल केली ‌गेली‌ होती. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे साम्राज्याचा विस्तार वाढला. इ.स. १६८०मधील महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या ८ वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या, मात्र १६८९ मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली. स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव सारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या पेशव्यांनी हिंदवी स्वराज्याच्या सिमा वाढविल्या. पेशवे हे एक उत्कृष्ट सेनानी होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक विस्तार पावले. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय उपखंडावर ताबा मिळवण्यापूर्वी बहुतेक भारतीय उपखंडातील मुघल राजवटीचा अंत करण्याचे श्रेय मराठ्यांना दिले जाते.[१][२][३][note १] शेवटी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव इंग्रजांबरोबर, तिसऱ्या इंग्रज-मराठा लढाईत पराभूत झाला व इंग्रज त्यांना बिठूर येथे पेन्शन देऊन पाठवले (झाशीच्या राणीच्या काळात).

गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या क्षेत्रावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व सेनासरखेल कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे सांभाळली. दक्षिण भारताच्या इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठा आरमाराने पोर्तुगीज व ब्रिटिश आरमारांना शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. सेनासरखेल कान्होजी आंग्रे यांनी भारताच्या पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.[५]

शिवाजी महाराजांचा शासनकाल[संपादन]

महाराष्ट्रात पुण्याजवळ राहणाऱ्या मराठ्यांनी मुघलांना या भागापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. त्यांनी शिवाजी महाराजांचा नेतृत्वाखाली स्वतःला विजापूरच्या मुस्लिम सुलतानांपासून स्वतंत्र करून घेतले. यानंतर ते अधिक आक्रमक झाले व उत्तरेमध्ये बऱ्याच चढाया करून त्यांनी राज्याचा विस्तार केला. इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराज छत्रपती झाले. महाराजांच्या मृत्यूपर्यंत मराठ्यांनी संपूर्ण मध्य भारत काबीज केला होता.

शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी[संपादन]

१६८१ मध्ये महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे बनले आणि त्यांनी वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली. राजपूत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या साऱ्या राजदरबाराला आणि ५,००,००० सैन्याला घेऊन दक्षिणेला आला. अपुरे सैन्य व फंदफितुरी असूनदेखील संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८९ अशी यशस्वी झुंज दिली. या काळात संभाजी महारांजानी एकही किल्ला गमावला नाही की आरमारातले एकही मोठे जहाज मोगलांच्या हाती लागून दिले नाही. जंजिय्राचे सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज, मोगल या चारही आघाड्यांना हा राजा पुरून उरला वतनदारी मिळवण्यासाठी संभाजी महाराजांच्या काही स्वकीयांनी मोगलांशी हात मिळवणी केली, मोगलांना त्यांची माहिती दिली आणि १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज फितुरीमुळे पकडले गेले. त्यांचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूचा परिणाम औरंगजेबाच्या अपेक्षेच्या उलट झाला, मराठ्यांनी शरण न जाता त्यापासून स्फूर्ती घेतली व ते अधिक तीव्रतेने लढू लागले. संभाजी महाराजांचे बंधू राजाराम हे नंतर राजा बनले. १७०० मध्ये सातारला मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबीज केले. याच काळात राजाराम राजेंचा सिंहगडावर मृत्यू झाला आणि त्यांची पत्नी ताराबाई यांनी त्यांचा मुलगा संभाजी दुसरा याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला. त्यांनी युद्धविरामाचा प्रस्ताव दिला पण बादशाह तयार झाला नाही. त्याच वर्षी मराठे नर्मदेच्या पार पोचले. माळव्याच्या मराठ्यांनी केलेला नवीन हल्ला आणि हैद्राबादमध्ये केलेली लूट यामुळे बादशाह वैतागला. दोन दशके चाललेले दक्षिणेचे युद्ध त्याच्या खजिन्यावर ताण देत होते. १७०५ मध्ये औरंगजेब आजारी पडला आणि दोन वर्षांनी मरण पावला. बादशहाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू, जे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र (म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा नातू) होते त्यांना बहादुरशाहने सोडले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे याची मदत घेऊन शाहूंनी निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता पेशवा बनले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य हळुहळू खिळखिळे होत गेले आणि मराठा साम्राज्य भारताच्या सर्वांत शक्तिशाली राज्य बनले. १७१३ मध्ये फारूख्सियार मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे [[सय्यद बंधू] म्हणून ओळखले जात होते. ते अलाहाबाद आणि पाटणा येथील राज्यपाल होते. पण बादशहाबरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरुद्धच्या लढाईत सामील झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि गुजरात, माळवा इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले.

थोरले बाजीराव पेशवे

ते १७३५ मध्ये राजस्थानात, १७३७ मध्ये दिल्ली आणि १७४० मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य फारच सैल पद्धतीने बांधले होते. दख्खनमध्ये जमा झालेल्या महसुलाचे विभाजन मराठा सरदारांच्यात केल्याने एकी निर्माण झाली. मराठा राज्य आता 'confederacy' बनले. मराठ्यांच्या अधिपत्याखालील भागांची विभागणी ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, माळव्याचे होळकर यांच्यात करण्यात आली. आणि ते मराठी साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. ताराबाईंना बेरारचे महसुल हक्क देण्यात आले आणि नागपूर ही त्यांची राजधानी बनली. बाजीराव १७४० मध्ये वारले. छत्रपती शाहू महाराजांनी त्याचा मुलगा नानासाहेबला पेशवा केले. याच वेळी त्याचा भाऊ रघुनाथराव राज्य विस्तार करत पंजाबपर्यंत पोचला. १७६० मध्ये निजामाच्या पराभवानंतर मराठी साम्राज्य कळसाला जाऊन पोहचले.

साम्राज्याची घसरण[संपादन]

मुघल सत्ता ढासळत असताना इ.स. १७५६-इ.स. १७५७ मध्ये अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात जानेवारी १३, इ.स. १७६१ या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.

१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. इ.स. १७७५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. यात मराठा सरदारांनी एकजूट होउन इंग्रजांचा सामना केला परिणामी अनेक ठिकाणी इंग्रजांचा पराभव झाला इ.स. १८०२ मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणून मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८०३-इ.स. १८०५) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण ओडिसा, गुजरात इत्यादी भाग गमवावे लागले. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणून सामील झाले.

मराठ्यांचे राज्यकर्ते[संपादन]

छत्रपतींचे राजवंश[संपादन]

पेशवे वंश[संपादन]

मराठेशाहीवरील पुस्तके[संपादन]

  • इतिहासाचे साक्षीदार : मराठेकालीन सांस्कृतिक वैभवाचा मागोवा (मुकुंद कुळे)
  • इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १,२,३ : कौस्तुभ कस्तुरे
  • छत्रपती शिवाजी महाराज पूर्वार्ध आणी उत्तरार्ध (वा.सी. बेंद्रे)
  • छत्रपती संभाजी महाराज (वा.सी. बेंद्रे)
  • झेप (त्र्यंबकजी डेंगळे) : ना.स. इनामदार
  • झुंज (यशवंतराव होळकर) : ना.स. इनामदार
  • पेशवाई : कौस्तुभ कस्तुरे
  • मंत्रावेगळा (दुसरा बाजीराव पेशवा) : ना.स. इनामदार
  • मराठा आरमार : एक अनोखे पर्व (डॉ. सचिन पेंडसे)
  • मराठाकालीन समाज आणि अंधश्रद्धा (सुभाष पाटील, अनिल बैसाणे, अनिल कठारे)
  • मराठे आणि आदिलशाही (अशोकराव शिंदे सरकार)
  • मराठे आणि महाराष्ट्र (शोधनिबंध संग्रह, डॉ. अ.रा. कुलकर्णी)
  • मराठे व इंग्रज (न.चिं. केळकर)
  • मराठेकालीन शौर्यकथा (प्रा. सु ह. जोशी)
  • मराठेकालीम समाजदर्शन (शं.ना. जोशी)
  • मराठे सरदार
  • मराठ्यांचा इतिहास (डॉ. पी.जी. जोशी)
  • मराठ्यांचा इतिहास (विभा आठल्ये)
  • मराठ्यांची न्यायव्यवस्था (मूळ इंग्रजी लेखक डॉ. व्ही.सी. गुणे, मराठी अनुवाद - डॉ. सदाशिव शिवदे)
  • मराठ्यांची बखर
  • मराठ्यांचे साम्राज्य
  • मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९
  • मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०
  • मराठ्यांच्या लढायांचा इतिहास (शि.म. परांजपे)
  • महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )
  • मालोजीराजे आणि शहाजी महाराज (वा.सी. बेंद्रे)
  • राऊ (थोरले बाजीराव पेशवे) : ना.स. इनामदार
  • शिवपुत्र छत्रपती राजाराम : डॉ. जयसिंहराव पवार
  • शिकस्त (पार्वतीबाई, सदाशिवराव भाऊंच्या पत्नी) : ना.स. इनामदार
  • शिवकाळ व पेशवाईतील दुष्काळाचा इतिहास (सुभाष पाटील, अनिल बैसाणे, अनिल कठारे)
  • शिवराज्याभिषेक प्रयोग (वा.सी. बेंद्रे)
  • सकलराजकार्यधुरंधर सदाशिवराव भाऊ : कौस्तुभ कस्तुरे
  • स्वराज्याचे शूर सेनानी : शहाजीराजांपासून.... यशवंतराव होळकरांपर्यंत (दामोदर मगदूम)
  • मराठ्यांचा इतिहास :इ.स.१६०० ते इ.स.१८१८(सोमनाथ रोडे)

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Pearson (1976), pp. 221–235.
  2. ^ Capper (1997):This source establishes the Maratha control of Delhi before the British
  3. ^ Sen (2010), pp. 1941–:The victory at Bhopal in 1738 established Maratha dominance at the Mughal court
  4. ^ Schmidt (2015).
  5. ^ Setumadhavarao S. Pagadi. SHIVAJI. p. 21. Unknown parameter |firstname= ignored (सहाय्य); Unknown parameter |lastname= ignored (सहाय्य)

फुटनोट[संपादन]

  1. ^ Some historians[४] may consider 1645 as the founding of the empire because that was the year when the teenaged Shivaji captured a fort from the Adilshahi sultanate.