बाळाजी विश्वनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाळाजी विश्वनाथ
पेशवा
पर्वती येथील बाळाजी विश्वनाथ यांचे चित्र
मराठी साम्राज्य
अधिकारकाळ नोव्हेंबर १७, १७१३ - एप्रिल २, १७२०
अधिकारारोहण नोव्हेंबर १७, १७१३
राजधानी पुणे
पूर्ण नाव बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख (पेशवे)
पदव्या छत्रपतींचे सेवक
जन्म १६६२ (तारीख अनिश्चित)
श्रीवर्धन, रायगड जिल्हा
मृत्यू एप्रिल २, १७२०
सासवड, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी परशुराम त्रिंबक कुलकर्णी
छत्रपती छत्रपती सम्राट शाहू महाराज
उत्तराधिकारी थोरले बाजीराव पेशवे
वडील विश्वनाथ परशुरामपंत (भट) देशमुख
पत्नी राधाबाई
संतती थोरले बाजीराव पेशवे, चिमाजी आप्पा
राजघराणे पेशवे


बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख ( इ.स. १६६२एप्रिल २, १७२०), किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ पराक्रमी योद्धा व मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते.

महादजी विसाजी देशमुख हे बाळाजींचे पणजोबा व भट घराण्याचे ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही देशमुखी १४७८ च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथांचे वडील व आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत असावेत असेही रियासतकार म्हणतात. १५७५ च्या सुमारास महादजींकडे ही परंपरागत देशमुखी होती. महादजींस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजींस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हे बाळाजीचे पिता. बाळाजींना ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी.

देशमुखीचे घराणे असल्याने बाळाजींस मोडी वाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांचे शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ ह्यांच्याशी बाळाजींचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली, त्यामुळे बाळाजींला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्‍ऱ्यांना सामील आहे या संशयाने सिद्दने भट घराण्याचा छळ चालू केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालून समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबाबरोबर साताऱ्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरू केल्यावर मुरूड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवून एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो.

बाळाजींबरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाऊ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हे "नाना फडनीस" यांचे आजोबा. (भट) देशमुख -फडनीस-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मोगलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्यांच्या हत्येच्या प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथांचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्यांचा पालखीत बसले आणि कटवाल्यांकडून मारले गेले. स्वामिनिष्ठेची ही पराकाष्ठाच होती.

बाळाजी विश्वनाथाची सुरुवातीच्या काळातील उमेदवारी[संपादन]

बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणून आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वतः अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्याने हाल-हाल करून मारले. अशाच अस्मामी-सुलतानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होते. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळून सगळे अनुभवत होते. १७०५ च्या दरम्यान त्यानी देखील आपली समशेर गाजवली.ती बहुतेक जास्तच परजली असावी, कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली. आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखील मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"

छत्रपती राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले गेले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंगजेबाशी झुंजत होती. सातारा, परळी(सज्जनगड), सिंहगड(कोंडाणा), पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणून प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडित" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कमी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्यासंबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहिलेले आढळते.

१७०७ आणि नंतर[संपादन]

२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला. ईदच्या मुहूर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहूंची सुटका केली. मात्र येसूबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहू महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते, शाहूने गादीवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहूने सुरुवातीला समजूतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहूंचा नाइलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहूंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावून घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आणि नारो राम यांनी शाहूंचा पक्ष बरोबर असून त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहूंच्या बाजूने गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. शाहूंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणून नेमले आणि सेनाकर्ते असा किताबही दिला.

अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वतःच्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहूंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजू शकतील हे आंग्‍ऱ्यांना बाळाजीनेच पटवून त्यांना शाहूंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधूंबरोबर तह घडवून आणला, मग त्यांच्याच साहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करून रफिउद्दौरजात याला गादीवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहूच्या पत्नींची सुटका करवून घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडू नये म्हणून बाळाजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांची मती गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्दसामर्थ्यावर घडवून आणले होते हे महत्त्वाचे. १७०७पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले. अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.

बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपद त्यांचे पुत्र बाजीरावाकडे आले.

बाळाजी विश्वनाथ पेशव्यासंबंधी थोडक्यात सर्व काही[संपादन]

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या स्वराज्यसेवेचा घटनाक्रम :-

  • सन १५७५ महादजीपंत भट श्रीवर्धनचे देशमुख
  • सन १६६० परशुरामपंत भट छत्रपती शिवाजीमहाराजांच्या कारकुनी सेवेत दाखल.
  • परशुरामपंत भट छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सेवेत सरदार.
  • सन १६८४ साली बाळाजी विश्वनाथ चिपळूण सोडून सासवडास पुरंदरे यांच्याकडे वास्तव्यास आले. सन १६८४ ते सन १६९९ औरंगजेबाच्या विरुद्ध रामचंद्रपंत यांच्या सेवेत.
  • सन १६९९ ते सन १७०३ पुणे प्रांताचे सरसुभेदार.

या कार्यकाळातील कार्ये

  1. नारायणगाव येथे बंधारा बांधला.
  2. नारायणगड हा किल्ला बांधला.
  3. विसापूर किल्ल्याची डागडुजी.
  • मोगलांशी एकीकडे मुत्सद्दी वाटाघाटी तर दुसरीकडे सिंहगड किल्यास पुरंदरे यांच्या मार्फत दारूगोळा रसद पुरवठा. या काळात दिम्मत सेनापती असा बाळाजी विश्वनाथ यांचा उल्लेख.
  • सन १७०४ ते सन १७०७ दौलताबाद प्रांताचे सरसुभेदार.
  • या काळात या सुभे दौलताबाद प्रांताचा उत्तम बंदोबस्त.
  • नोव्हेंबर सन १७०५ मध्ये दहा हजार फौजेनिशी दिंडोरीवर स्वाऱ्या.
  • बाळाजी विश्वनाथ यांची हुशारी पाहून

अंबाजीपंत पुरंदरे व प्रतिनिधी यांच्या शिफारशीनुसार सेनापती धनाजी जाधव यांच्या सेवेत. फौज बाळगून प्रतिकूल परिस्थितीत उत्तम महसूल वसूली.

  • बाळाजी विश्वनाथ यांची ताराबाईसाहेबांकडून रांगणा किल्यावर नेमणूक.
  • सन १७०५ औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला असतांना बाळाजी विश्वनाथ यांची मोगलांच्या ताब्यातील गुजरातवर स्वारी. झाबुआ व गोध्रा प्रांतांचा मोगल सुभेदार मुरादबक्ष याचा पराभव.
  • मुरादबक्षचा दोन लाख दहा हजार खंडणी भरून बाळाजी विश्वनाथ यांच्याशी तह.

शाहूमहाराज यांची दिनांक ८ मे सन १७०७ रोजी दारोहा गावी सुटका.

ऑक्टोबर सन १७०७ च्या खेडच्या निर्णायक लढाईत सेनापती धनाजी जाधव यांना थोरल्या धन्याविरूद्ध न लढण्याचाबाळाजींचा सल्ला. सेनापती धनाजी जाधव आणि शाहूमहाराज यांची भेट. सेनापती धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ शाहूमहाराजांच्या सेवेत दाखल. खेडची लढाई. सातारा शाहूमहाराजांकडून काबीज.

दिनांक १२ जानेवारी सन १७०८ सातारा येथे शाहूमहाराज यांचा राज्याभिषेक. छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडून अष्टप्रधानांच्या नेमणूका. बाळाजी विश्वनाथ यांची अमात्यांचे मुतालिक म्हणून नियुक्ती.

दिनांक २७ जून सन १७०८ सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

दरम्यान छत्रपती शाहूमहाराजांकडून बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते किताब व सेना उभारणीसाठीच्या खर्चास पंचवीस लाख दहा हजार दोनशे रूपयांचा सरंजाम बहाल.

सन १७१२-१३ छत्रपती शाहूमहाराज यांचे पेशवा बहिरोपंत पिंगळे यांची सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वर स्वारी. स्वारीत पेशवा बहिरोपंत पिंगळे यांचा सरखेल कान्होजी आंग्रे यांजकडून पराभव. पेशवा बहिरोपंत पिंगळे कैदेत. याच स्वारीत श्रीपतराव प्रतिनिधी यांनी गाजविलेल्या पराक्रमामुळे शाहूमहाराजांच्या कैदेत असलेले परशुरामपंत प्रतिनिधी यांची कैदेतून सुटका. दिनांक १६ मार्च सन १७१३ रोजी परशुरामपंत प्रतिनिधी यांची पेशवा म्हणून नियुक्ती. आंग्रे यांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची चालढकल. दिनांक १९ जून सन १७१३ रोजी पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची पून्हा प्रतिनिधी पदावर नियुक्ती.

पेशवा पद दिनांक १९ जून सन १७१३ ते दिनांक १६ नोव्हेंबर सन १७१३ पर्यंत रिक्त.

दरम्यानच्या काळात बाळाजी विश्वनाथ यांचे फौजेचे वळण चांगले असल्याने बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा पद देण्याविषयी अंबाजीपंत पुरंदरे आणि प्रतिनिधी यांची शाहूमहाराज यांच्याकडे शिफारस. दिनांक १७ नोव्हेंबर सन १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवा पदी नियुक्ती.

सन १७१८ जानेवारीत पोलवण येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांची पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी भेट घेऊन सरखेल कान्होजी आंग्रे यांना शाहूमहाराजांच्या पक्षात आणण्यात यश आले. दिनांक २८ फेब्रुवारी सन १७१४ रोजी पेशवे व आंग्रे यांच्यात सलोख्याचा तह. बहिरोपंत पिंगळे व निळो बल्लाळ चिटणीस यांची सुटका. सरखेल कान्होजी आंग्रे शाहूमहाराजांच्या पक्षात आल्याने पश्चिम किनारपट्टीवर शाहूमहाराज यांची सत्ता स्थापन झाली.

नोव्हेंबर सन १७१५ पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी पुणे प्रांत स्वराज्यात आणला. चंद्रसेन जाधव याने शाहूमहाराज यांना व दमाजी थोरात याने बाळाजी विश्वनाथ यांना कपटाने कैद करण्याचा कट रचला. ५ ऑगस्ट सन १७१६ रोजी दमाजी थोरात यांजकडून पेशवा बाळाजी विश्वनाथ, अंबाजीपंत पुरंदरे आदी यांना कपटाने कैद केले. खंडणी देऊन सुटका झाली. बाळाजी विश्वनाथ यांनी पिलाजी जाधव यांच्यावर दमाजीची मोहीम सोपवली. पिलाजी जाधव यांनी दमाजी थोरात याचा पराभव करून त्यास अटक करून या प्रकरणाचा कायमचा सोक्षमोक्ष लावला.

सन १७१४ आंग्रे - पेशवे यांच्या संयुक्त स्वारीने जंजीरेकर हबशाकडील काही किल्ले स्वराज्यात आणले.

सन १७१७ - १८ पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि हुसैन अली सय्यद यांनी कोल्हापूरकर संभाजींचा पूर्ण पाडाव केला. गुजरात, खानदेश आदी बादशाही मुलखात मराठ्यांनी छापेमारी आरंभली.

सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहिमेवर रवाना झाले. सय्यद बंधूंनी मदतीबदल्यात पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याशी स्वराज्याचा मुलूख, मराठ्यांचे चौथाईचे हक्क आदी बाबतच्या शाही सनदा देण्याचा तह केला. सय्यद बंधूंनी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या साह्याने बादशहा फर्रूखसियरला पदच्युत केले व त्याच्या जागेवर रफिउद्दोरजात बादशहा केले. या सर्व धामधुमीचा फायदा उचलत पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरीवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली. शाही सनदा मिळाल्यानंतर पेशवा बाळाजी विश्वनाथ साताऱ्यास आले. या मोहिमेतील खर्च वजा करून पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी तीस लाख रुपये व शाही सनदा छत्रपती शाहूमहाराजांच्या चरणी अर्पण केल्या.

सन १७१९ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी चासकर जोशी यांच्यामार्फत कल्याण - भिवंडी प्रांत स्वराज्यात आणला. यानंतर बेळगांव, रूकडी, तावळे, डिग्रज या भागात मोठी मोहीम राबविण्यात आली. सेनाखासखेल यशवंतराव थोरात यांचा बंदोबस्त करून आष्टा व येळावी ही दोन महत्त्वपूर्ण ठाणी ताब्यात घेतली. कोल्हापूरकर संभाजी राजे आणि शाहूमहाराज यांच्यात वैमनस्य वाढत होते. दरम्यान पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी कोल्हापूरला वेढा घातला. दिनांक २० मार्च सन १७२० रोजी कृष्णतीरावरील उरणबाहे येथे कोल्हापूरकर संभाजी राजे यांचा पूर्ण पराभव करून त्यांनी संभाजी राजेंना साताऱ्यास राजदर्शनासाठी आणले. साताऱ्यास राजबंधूंच्या भेटीगाठी, राजकीय खलबते झाली.

मोहिमेनंतर सासवड येथे घरी परतल्यावर चाळीस वर्षांच्या अविश्रांत दगदगगीने पेशवा बाळाजी विश्वनाथ आजारी पडले. अखेर दिनांक २ एप्रिल सन १७२० रोजी एका कर्तव्यदक्ष, कर्तबगार पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची प्राणज्योत मावळली.

बाळाजी विश्वनाथ यांच्यावरील पुस्तके[संपादन]

खालील विभागाचे इतर लेखात स्थानांतरण विकिकरण करून संदर्भासहित पुनर्लेखन करावे[संपादन]

बाळाजीच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमहिका लागली, त्यांत बाजीरावास पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले[ संदर्भ हवा ]. कारण हा बाजीराव फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडू नये म्हणून शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले गेले. मात्र पडत्या काळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती, त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के-कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यांत माळवा(डिसेंबर,१७२३), धार(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपूर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(१७ मे १७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती, आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉंटगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि साताऱ्याच्या राजगादीइतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारीकुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले.

दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्याच्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजान्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. खुद्द गढीत बंदिस्त वजिरानेच "बम्मन होने के बावजूद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.

या मदतीने खुश होऊन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली[ संदर्भ हवा ], जेणेकरून बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतील. या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडून समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरिता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला.

चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण घाट आणि किनाऱ्यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.

बाजीराव आणि चिमाजीने खरोखरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खनपासून रुमशेपावतो पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासीरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासीरजंगने हांडिया व खरगोण हे प्रदेश बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फूट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्त्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वतः बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वतःची कामे शक्यतो स्वतः करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वतः बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.

बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास शाहु महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. नानासाहेबाने पुण्याला खऱ्या अर्थाने शहराचे रूप दिले. सदशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ आणि पर्वती हे नानासाहेबाच्या आज्ञेवरून बांधेले गेले. शिवाय मुठेवर "लाकडी पुल" त्यानेच बांधुन घेतला. पुण्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होत रहावा म्हणून यानेच "कात्रज" वसवले. नानासाहेबाने खऱ्या अर्थाने मराठे शाहीचा अटकेपार गेलेला सुवर्णकाळ बघितला त्याच बरोबर मराठ्यांना पानिपतचा प्राणांतिक फटका याच्याच करकीर्दीत बसला. व्यवस्थापनाच्या दृष्टिने मात्र नानासाहेबाने आपले काम चोख बजावले. रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षीच अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे १७५८ रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे - "आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करू. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुलतान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरशः नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेऊन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतील. आम्ही आपले राज्य कंदाहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे." बाजीरावापासून राघोबांपर्यंतच्या या सगळ्या विजयांमुळे मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधू नदी आणि कश्मीरपर्यंत, पूर्वेला ओरिसापर्यंत, नैर्ऋतेला गोव्यापर्यंत आणि दक्षिणेला म्हैसूरपर्यंत पसरले. निजामाला तर मराठ्यांनी मिळेल तिथे पिटून काढले. सदाशिवराव भाऊनेही हैदराबादच्या निजामाला सळो की पळो करून सोडले. दिल्लीचे सिंहासन मराठ्यांनी आपल्या टाचेखाली आणले. शिवछत्रपतींची "थोरली मसलत" म्हणजेच दिल्लीवरचा हक्क पेशव्यांनीच प्रस्थापित केला. याच घटनेवर वीर सावरकरांसारख्या प्रतिभावान कवीने तर "अटकेवर जरीपटका म्हणून २६० ओळींचा पोवाडाच लिहून काढला". तो संपूर्ण पोवाडाच वीरश्रीने भरला आहे, सगळा पोवाडा इथे देता येत नसला तरी त्याच पोवाड्यातील काही मोजक्या ओळी पुढील प्रमाणे -

ऐका ऐका हिंदुमात्र हो! वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या सात शतकांचा उगवे सुड जिंकिले जेत्याला॥१॥

जो जो मागे आला आसुर शक्तीच्या की भरावरी, भारतीय यज्ञाश्व नाचला त्याच्या त्याच्या उरावरी॥४३॥

कुठे आज ते शक? वा बर्बर? बाल्हीकही? वा हूण कुठे? भारतीय जठरग्नीत जळुनी भस्म जाहले द्रुत ते ते॥४४॥

परी आज ते शल्य उपटले आज तोडिला ध्वज तो रे, आज जिंकिली तीही लढाई, आजि महंमद-मद उतरे॥६४॥

हिंदूवीरांचा कीं श्रीशे असे यशस्वी हट केला, आज हिंदवी जरिपटका की पुन्हा पोचला अटकेला॥८०॥

पठाण मोंगल तुर्क इराणी-दाढी तितुकी सामोरी, पुर्तुगिज वलंदाज फिरंगी टोपी तितुकी पाठिवरी॥१३१॥

परी तितुक्यांहीसहित मराठा-वीर झुंज करी, एक्या ह्स्ते उपटित दाढी टोपी उडवी दुज्या करी॥१३२॥

पालखेडसी निजाम पिटला अल्ली पिटिला बंगाली, अर्काटासी नबाब पिटला, पिटिला सिद्दी जली स्थली॥१६४॥

बादशहाच्या बादशाहिची जाळुनि दाढी दिल्लीवरी, होता की नव्हतासा केला निजाम पिटूनि भोपळी॥१८०॥

जयजयकारे भरा अंबरा करा महोत्सव घरोघरी, मांगलिका कीं हिंदुमात्र हो वार्ता आतांची आली॥२२०॥

आज सात शतकाने विजयी मिरवित सोनेरी तोडा, पिई सिंधुचे पाणी पुनरपि हिंदु सैनिकांचा घोडा॥२५२॥

पानिपत[संपादन]

मात्र राघोबादादाची पाठ फिरताच दिल्लीतील शहा, अहमदशहा अब्दालीशी चुंबाचुंबी करू लागला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सदाशिवरावभाऊ(चिमाजी अप्पाचा पुत्र) शिंदे, होळकर, गायकवाड, मेहेंदळे असे तोलामोलाचे सरदार घेउन जाट व रजपुतांच्या मदतीने दिल्लीवर चालुन गेला. दिल्ली ताब्यात येताच त्याने विश्वासरावाला आपल्या पुतण्याला सिंहासनावर बसवण्याचे ठरवले. मात्र उद्या हिंदु राजा बसवुन भाऊ निघुन जाईल, पण अफगाणांनी चिडुन आक्रमण केले तर उत्तरेतिल सगळी राज्ये त्या खाली भरडली जातिल ही भीती जाट-शिख-रजपुतांना वाटली, त्यांनी या गोष्टीला नकार दिला. मात्र मराठ्यांची दहशत रहावी म्हणून सदशिवरावभाऊने घणाचे घाव घालुन दिल्लीचे तख्त फोडले. पण जाट-रजपुतांची भीती खरी ठरली. राघोबाने डिवचलेला अब्दाली संधीची वाटच बघत होता. मराठ्यांनी दिल्लीवर आक्रमण करताच दिल्ली आपल्या ताब्यात रहावी म्हणून त्याने मोर्चा बांधणी चालु केली. १७ ऑक्टोबर १७६० रोजी त्याने दिल्लीच्या दिशेने कुच केले. अगदि २४-२५ तारखेपर्यंत तो भागपतपर्यंत आला. मराठी सैन्य या वेळी धान्याच्या चणचणी मुळे कुंजपुराकडे वळली होती. मराठी सैन्याने अब्दालीने यमुना ओलांडु नये म्हणून फारसे काही प्रयत्न केले नाहीत. आधीच आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपल्याच प्रभावाखाली असलेल्या भूमीवर अब्दालीला अंगावर घेऊ असा विचार भाऊने केला. हे अब्दालीच्या पथ्यावरच पडले, त्याचे सैन्य अगदी सोनपत आणि पानिपत नजीक येउन ठेपले. भाऊला त्या भागाची फारशी माहिती नव्हती, उत्तरेतिल त्याची पहीलीच मोहीम होती. सुरुवातिला छोट्या-छोट्या चकमकीत मराठी सैन्याने हिसका दाखवला असला तरी अनुभवी अब्दालीच्या सैन्याने १४ जानेवारी १७६१ रोजी मुख्य लढाईला तोंड फ़ोडले. या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत दोहो बाजुचे मोठे नुकसान झाले.

यात मराठ्यांचा मोठा पराभव झाला. लाखापेक्षा पेक्षा जास्त मराठी सैन्य कापले गेले. १८ वर्षांचा कोवळा विश्वासराव लढाईत मारला गेला. सदशिवरावभाऊ देखिल कामी आला. दोघांची प्रेते अफगाणी सैनिकांच्या हाती लागली. कोवळ्या विश्वासरावाचे प्रेत बघून तर अब्दाली चाटच पडला "सुभान अल्लाह, क्या नुर है? मरनेके बाद इतना हसीन है तो जिंदा कैसा होगा?" अश्या आशयाचे उद्गार त्याच्या तोंडुन निघाले. म्हणूनच अब्दाली विश्वासरावाच्या प्रेताला आपल्या बरोबर घेऊन जाणार होता असे म्हणतात. ब्रिटिश पत्रे देखिल विश्वासरावाला "Most handsom among marathas" असे म्हणतात. असे समजतात की पानिपतच्या लढाई नंतर पुणे भागातील एकही घर असे नव्हते की ज्या घरातला पुरुष कामी आला नव्हता पेशवाईची पत्रे याचा उल्लेख घरोघरी बांगड्या फुटल्या असे करतात. नानासाहेबाला जे पत्र आले त्यात लिहीले होते "दोन ही्रे हरवले, काही मोती हरवले आणि मोहोरा किती हरवल्या याला गणानाच नाही". पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला खरा पण मराठ्यांनी अब्दालीला देखिल असा फटकावला की त्या नंतर दिल्लीकडे परत तो कधीच फिरकला नाही. आजही तेथील माणसे जिंकलेल्या अब्दालीपेक्षा हरलेल्या मराठ्यांना मान देतात, भाऊने जेथुन लढाईची सुरुवात बघितली होती तिथे हरीयाणा सरकारने एक स्मृतीस्तंभ उभा केलाय. मात्र पानिपतचा पराभव मराठ्यांच्या सत्तेवरचा मर्मप्रहार ठरला. त्यानंतर मराठी सत्ता परत पुर्वीच्या तडफेने कधीच उठली नाही. मराठ्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला.

थोरले माधवराव प्रशासनपर्व[संपादन]

आपल्या स्वकीयांच्या आणि मुलाच्या मृत्युची बातमी ऐकुन नानासाहेब खचले. त्यांनी त्याची हाय खाल्ली हेच दुःख उराशी कवटाळुन हा महान पेशवा २३ जून १७६१ रोजी वारला. त्यांच्या धाकट्या मुलाने माधवराव पेशवा १ला याने मात्र पुढच्या काही वर्षात दक्षीणेत मराठी सत्तेचा दरारा परत प्रस्थापित केला. माधवरावास २० जुलै, १७६१ रोजी पेशवाईची वस्त्रे मिळाली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी - १७६२ उरळी, नोव्हेंबर १७६२ घोडनदी, ऑगस्ट १७६३ राक्षसभुवन या लढाया केल्या. निजामाला १७५९ला उदगीरला सदाशीवरावभाऊने निजामाला हरवुन ८५ लाखाचा मुलुख हस्तगत केला होता. त्याचा सुड घेण्यासाठी मराठयांच्या नाजुक परीस्थितीचा फायदा घेत नळदुर्ग, अक्कल्कोट या ठिकाणी निजामाने धुडगुस घालत होता. माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ रोजी मोहिम हाती घेतली. पण २९ डिसेंबर, सन १७६१ मध्ये राघोबादादांनी अनपेक्षीत तह केला. या नंतर पेशव्यांनी हैदरालीखान विरुद्ध मोहिम उघडली, मात्र रघुनाथरावांनी निजामाशी हातमिळवणी करून घरभेदीपणा केल्याने माधवरावांनी तात्पुरती शरणागती पत्करली. मात्र निजाम व राघोबादादा यांच्यात बेबनाव सुरू झाला निजामाने पुण्यावर हल्ले केले. या नंतर औरंगाबादवर मराठ्यांनी हल्ले केले. पुढे राक्षसभुवन येथे १० ऑगस्ट १७६३ च्या युद्धात पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला. निजामाकडून उदगीरचे ६० लाख आणि नवीन २२ लाख असा एकूण ८२ लाखांचा मुलुख मरठ्यांनी मिळवला. माधवरावाने हैद्राबादच्या निजामाला दाती तृण धरायला लावले. या नंतरच्या काळात माधवरावांनी कर्नाटकवर एकंदर ५ स्वाऱ्या केल्या. या मोहिमांमुळे अगदी शहाजीराजांच्या वेळचा जहागिरीचा सर्व मुलुख परत मराठ्यांना मिळाला. या मोहिमांत माधवरावाचे शिस्त, चिकाटी, शौर्य, जरब हे गुण हे गुण उजळुन निघाले. १२ वर्षांत त्याने मराठी सत्तेचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवुन दिला. मराठ्यांचा ब्रिटीश इतिहासकार ग्रँड डफ हा माधवराव पेशव्याची तुलना त्याचाच आजा पहिला बाजीराव याच्या बरोबर करतो. राघोबादादाने मात्र माधवरावाच्या पेशवा बनण्याला विरोध केला. राघोबादादाला पेशवेपद त्याच्याकडे पाहिजे होते. म्हणजे शाहुराजे - ताराराणी मधला जुना वादच परत या दोघात चालु झाला. शेवटी नाईलाजाने माधवरावांनी राघोबादादांना नजरकैदेत टाकले. पुढे आतड्याच्या क्षयाच्या आजाराने माधवरावांचे १७ नोव्हेंबर १७७२ रोजी थेउर येथे गणपती मंदीराच्या ओसरीतच निधन झाले. ग्रँड डफ म्हणातो - "पानिपतापेक्षाही माधवरावाचा मृत्यु हा पेशवाईसाठी दुस्वप्न ठरला." माधवराव गोरेपान, उंचपुरे, आणि थोराड शरीराचे होते, काळेभोर आणि पाणीदार डोळे, उग्र चेहेरा याच बरोबर मितभाषी असून एरवी बोलताना रोखठोक आणि ठासुन बोलत. लेखन रेखिव होते. राज्याच्या कर्जफेडीसाठी स्वतःचे लाखो रुपये, जडजवाहिर दिले. बाजीरावाप्रमाणेच माधवरावांना देखिल चैन, आळस, लबाडि बिलकुल खपत नसे.

पेशवाईचे पुनरुत्थान[संपादन]

त्या नंतर डिसेंबर १७७२ मध्ये त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा झाला. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. १७७३ मध्ये राघोबादादाच पेशेवे झाले. नारायणरावांच्या मृत्युची चौकशी करून न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी त्याचा ठपका राघोबादादांवर ठेवला, राघोबांनी निमुटपणे पेशवेपदावर नारायणरावाचा पुत्र माधवराव २रा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले. १७९६ पर्यंत त्यांनी गादी चालवली. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकुन राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमले तेव्हा अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवुन पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुनः पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे नाना फडणिसांनी इंग्रजांची २-३ राजकिय व लष्करी आक्रमणे परतवुन लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले.

पेशवाईचा अस्त[संपादन]

सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर पेशवेपदावर राघोबादादाचा पुत्र दुसरा बाजीराव आला, हाच तो पळपुटा बाजीराव. यशवंतराव होळकराला भिउन हा पुणे सोडून पळाला आणि वाई येथील इंग्रजांच्या आश्रयाला गेला. इथुन प्रत्येक बाबतित इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. ३१ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या करारा नुसार बाजीरावाने इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारुन, त्या फौजेच्या खर्चासाठी मोठा मुलुख इंग्रजांच्या घशात घातला. १८०० साली नाना फडणवीस यांचा मृत्यु झाल्यावर पेशवाईतील उरले-सुरले शहाणपण संपले. १७९९ मध्ये टिपु सुलतान आणि १८०० साली नाना फडणवीस यांचा मृत्यु झाल्यावर इंग्रजांना पुणे हे सोपे आणि एकुलते एक लक्ष झाले. १८०३ च्या तहा नंतर देखिल बाजीराव आणि ब्रिटीश यांच्यात धुसफुस चालुच राहीली. शेवटी त्याची परीणीति ५ नोव्हेंबर १८१७ या दिवशी खडकी येथील लढाईत झाली. ईस्ट इंडिया कंपनीने लेफ्टनंट कर्नल बर(Burr) याच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या बाजीरावाचा पराभव केला. १८१८ मध्ये अशीरगडजवळ धोलकोट येथे John Malcolm याच्या समोर मराठ्यांनी शरणागती दिली. काही इतिहासकार याची २ कारणे देतात १)२रा बाजीराव हा नजरकैदेतच वाढला असल्याने त्याला दरबारी कामकाज व राजकारण आणि युद्धातले छक्के-पंजे माहीत नव्हते, २)पेशव्यांच्याच हाताखाली मोठे झालेले सरदार आता पेशवाईलाच धाक दाखवत होते. अशी संकटे या आधीच्या कोणत्याच पेशव्यावर आली नव्हती. इंग्रजांनी त्याचे राज्य हिसकावुन त्यास वार्षिक ८ लक्ष रुपयांचे पेन्शन चालु केले, त्याची रवानगी कानपूरजवळ ब्रह्मवर्तास झाली. इंग्रजांनी रायगड देखिल ताब्यात घेतला, रायगडवर त्यांनी सगळी हिशेब आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमिनदोस्त केल्या.

इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला. बाजीरावास अनेक लग्नांनंतर देखिल मूल झाले नव्हते, शेवटी वेणगांव(कर्जत-रायगड) येथील माधवराव भट जे बाजीरावाच्या सांगण्यावरून ब्रह्मवर्तास स्थायिक झाले होते त्यांच्या "गोविंद" नावाच्या मुलाला दत्तक घेतले. त्याचेच नाव धोंडोपंत ठेवले, हेच ते स्वातंत्र्यसेनानी "नानासाहेब पेशवे" या शिवाय बाजीरावाने २ मुले दत्तक घेतली होती - गंगाधर उर्फ बाळासाहेब आणि सदाशिव उर्फ दादासाहेब. २रा बाजीराव २८ जानेवारी १८५१ मध्ये वारला, मात्र ११ डिसेंबर १८३९ च्या त्याच्या मृत्युपत्रा प्रमाणे इंग्रजांनी नानासाहेबास उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिली तरी पदव्या आणि पेन्शन देण्यास नकार दिला. नानासाहेबच नव्हे तर भारतातील बऱ्याच संस्थानांना इंग्रजांनी तनखा नाकारला, काहांची तर संस्थानेच वारसाहक्का वरून किंवा दत्तकविधानावरून खालसा करावयास घेतली.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर आणि सामाजिक परिस्थिती.[संपादन]

सगळीकडे असंतोष पसरत चालला होता. १८३०पासूनच इंग्रजांचे कंपनी सरकार भारतीय उद्योगांची जाणून बुजून गळचेपी करत होते. माल निर्यातीवर जबर कर लादला होता, आणि इंग्लंडमधून येणारा माल आयात अत्यल्प बसविल्याने स्वस्तात विकला जाई. भारतीय उद्योगांचे तीनतेरा वाजले. १८३०-३१ सालचा विनिमय दर होता १५ भारतीय रु. = १ स्टर्लिंग पाउंड. यावरून भारतीय धंदे का बुडित गेले याचे सुस्पष्ट कारण समजते. आर्थिक आघाडी अशी पिछाडली होती तर भारतीय सैनिकाचे पगार देखील इंग्रज सैनिकांपेक्षा कित्येक पटींनी कमीच होते, त्यांना बढती अशी कधी मिळतच नसे. यातच भर म्हणून सामाजिक स्थित्यंतरे घडत होती हिंदूंच्या धार्मिक रिवाजांत कायद्याने आडकाठी करण्यात आली, समुद्रयात्रेला हिंदु धर्माने धर्मबाह्य ठरवल्याने ही समुद्रयात्रेची अट शिपायांना जाचक ठरू लागली. मात्र या असंतोषाला वाढवण्याचे मुख्य कारण घडले - काडतुसांना लावलेली चरबी, ही गायीची किंवा डुकराची असे. गाय हिंदूंना पवित्र आणि डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असल्याने सैनिकांमधे प्रचंड असंतोष पसरला होता. या सर्व थरांतील असंतुष्ट घटकांना नानासाहेब पेशव्यांनी एकत्र आणले. यात त्यांना केवळ पेन्शन मिळाले नाही म्हणून संस्थानिकांनी भारतीय सैनिकांना चिथवुन हे बंड घड्वून आणले किंवा मुसलमानांना आपली सत्ता परत पाहिजे होती म्हणून त्यांनी हिंदूंना धाक घालून हा "जिहाद" घडवला असे म्हणणाऱ्यांनी १८५७ च्या आधीची नानासाहेबांनी - झाशीची राणी किंवा आसाम, जयपुर, चांदा, ग्वाल्हेर, रेवा, संबलपूर या आणि अशा शेकडो राजे-राजवाड्यांना १८५४पासूनच या युद्धाबाबत लिहीलेली पत्रे वाचावीत. किंवा लष्करी छावणीत सैनिकांकडून कमळावर आणि नागरिकांकडून भाकऱ्यांवर हात ठेवून घ्यायला लावलेली शपथ बघता यात नानासाहेबांनी किती गुप्तता ठेवली होती हे लक्षात येते. केवळ वार्षिक ८ लाखाच्या तनख्यासाठी लढणारे नाना नव्हतेना झाशीची राणी. २ऱ्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर नानासाहेबांच्या आई नेपाळ येथे राहिल्या, तेथे त्यांनी ८० गावे ’खरेदी’ केली या वरून नानासाहेबांसाठी बाजीरावाने ७ पिढ्या पुरेल इतका पैसा सोडला होता हे समजते, त्यापुढे ८ लाखाचे पेन्शन ते काय?

संदर्भ[संपादन]