पुरुषोत्तम पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. पुरुषोत्तम पाटील (जन्म : बहादरपूर - जळगाव जिल्हा, ३ मार्च, इ.स. १९२८; - धुळे, १६ जानेवारी, इ.स. २०१७) हे एक मराठी कवी आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते. ते मूळचे अमळनेर तालुक्यातील ढेकू या गावचे. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. पुरुषोत्तम पाटलांचे सातवीपर्यंतचे शिक्षण बहादरपूर या गावी, आणि नंतरचे अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधे झाले. याच काळात त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. पुढे कॉलेज शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर तेथील समृद्ध वाङ्‌मयीन संस्कृतीमुळे त्यांच्या काव्यलेखनाला अनुकूल वातावरण लाभले.

फर्ग्युसन कॉलेजात असताना पाटलांच्या कविता सत्यकथामधून प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी पुढे जनशक्तीमधे उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चिंचोली, हातेड येथील शाळांच्या मुख्याधापकाची जबाबदारी स्वीकारली. कला शाखेची पदवी घेतल्यावर ते १९६१मध्ये धुळे येथील श्रीशिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले.

कवयित्री सरिता पदकी या महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम पाटील त्यांचे सहाध्यायी होते. सरिताबाईंच्या कविता पुरुषोत्तम पाटील यांनी स्वहस्ते उतरवून काढून, ’साहित्य’, ’अभिरुची’ आणि ’सत्यकथा’ या तीन प्रतिष्ठित नियतकालिकांकडे पाठवल्या होत्या. त्या तिन्हीकडेही प्रसिद्ध झाल्या, आणि सरिता पदकी यांना साहित्यवर्तुळात थोडे स्थान मिळाले. मात्र त्या वेळेपर्यंत पाटलांनी आपल्या कविता प्रसिद्धीला दिल्या नव्हत्या.

पुरुषोत्तम पाटील यांनी काव्यलेखनाची प्रेरणा बोरकरांसारख्या थोर कवींकडून घेतली असली तरी त्यांची कविता कुठेही अनुकरणाच्या किंवा कुठल्याही प्रथेच्या आहारी गेलेली नाही. पुरुषोत्तम पाटील हे एक अव्वल दर्जाचे कवी आहेत, असे कुसुमाग्रजांनी ’परिदान’च्या प्रस्तावनेत म्हटले आहे.

सन १९४७पासून काव्यलेखन करणाऱ्या पुरुषोत्तम पाटील यांचा पहिला काव्यसंग्रह ‘तळ्यातल्या साउल्या’ १९७८मध्ये प्रकाशित झाला.

इ.स. १९८२मध्ये ‘सत्यकथे’चा अस्त झाला होता. आणि केवळ साहित्य या विषयाला वाहिलेली लघुनियकालिके फार मोठा पल्ला गाठू शकली नव्हती, हे जाणून पुरुषोत्तम पाटील यांनी कै. बा.भ. बोरकर यांच्या स्मरणार्थ काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा व कविविमर्श यांनाच केवळ वाहिलेले एक ’कविता-रती’ नावाचे द्वैमासिक सुरू केले. या नियतकालिकाचा पहिला अंक धुळ्याहून ३० नोव्हेंबर १९८५ रोजी प्रसिद्ध झाला. त्यापूर्वी पुरुषोत्तम पाटील हे ‘अनुष्टुभ’ मासिकाचे साडेचार वर्षे संपादक होते.

पुरुषोत्तम पाटील हे स्वतःच कवी असल्याने त्यांच्या मनात कवितेसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी होतीच. शिवाय ‘अनुष्टुभ’ या नियतकालिकाच्या संपादनाचा अनुभव गाठीशी होता. या भांडवलावर केवळ ‘काव्य आणि काव्यसमीक्षा’ यांना वाहिलेल्या या नियतकालिकाचा त्यांनी प्रारंभ केला. वाङ्मयीन नियतकालिकाचा डोलारा सांभाळताना करावी लागणारी सर्वप्रकारची कसरत ते आजतागायत करत आहेत. ‘कविता- रती’साठी कोणत्याही प्रकारची शासकीय मदत वा अनुदान त्यांनी घेतलेले नाही. वर्गणीदार आणि असंख्य हितचिंतक यांच्या बळावर हे नियतकालिक सुरू आहे (इ.स. २०१५).

अनेक वर्तमानपत्रांतून पाटलांनी साहित्यिक आणि सामाजिक विषयांवर लेख लिहिले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचे ते सदस्य होते.

’कविता-रती’ची सूची[संपादन]

’सत्यकथा’, ’महाराष्ट्र साहित्य पत्रिका,’ ’अस्मितादर्श’ या वाङ्मयीन नियतकालिकांप्रमाणेच ’कविता-रती’त प्रसिद्ध झालेल्या मजकुराला मोठे संदर्भमूल्य आहे हे जाणून, डॉ. आशुतोष पाटील यांनी कविता-रतीत नोव्हेंबर १९८५ ते डिसेंबर २०१२ या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या मजकुराची जंत्री ’कविता-रती सूची’ या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध केली आहे.

या सूचीचे तीन मुख्य विभाग असून त्यांत कवि-कवितांची यादी, समीक्षक-समीक्षालेखांची जंत्री, परीक्षणलेख आणि ते लिहिणारे लेखक यांची, मुखपृष्ठे-रेखाटनांची आणि संपादकांच्या मुलाखतींचीही सूची आहे. ग्रंथाला एक परिशिष्टसुद्धा आहे.

पुरुषोत्तम पाटील यांचे कवितासंग्रह[संपादन]

  • अमृताच्या ओळी (वर्तमानपत्रांतील लेखांचा संग्रह)
  • तळ्यातल्या साउल्या (कवितासंग्रह)
  • तुकारामाची काठी (वर्तमानपत्रांतील लेखांचा संग्रह)
  • परिदान (कवितासंग्रह)

पुरस्कार[संपादन]

  • ‘तळ्यातला साउल्या’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार