पी.एन. भगवती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

न्या. प्रफुलचंद्र नटवरलाल भगवती (डिसेंबर २१, १९२१ - १५ जून, इ.स. २०१७) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे मुख्य न्यायाधीश होते. त्यांची इ.स. १९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झाली आणि जुलै १२, १९८५ ते डिसेंबर २०, १९८६ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

भगवती यांचे वडीलही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. पी.एन. भगवती यांचा जन्म २१ डिसेंबर १९२१ रोजी गुजरातमध्ये झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून भगवती मुंबई विद्यापीठाचे १९४१ साली पदवीधर झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून त्यांनी वकिली करायला सुरुवात केल्यानंतर जुलै १९६०मध्ये ते गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले आणि पुढे सप्टेंबर १९६७मध्ये सरन्यायाधीश. अल्पकाळासाठी ते गुजराथ राज्याचे २ वेळा गव्हर्नर झाले होते. पी एन भगवती यांचे १५-६-२०१७ रोजी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

जनहित याचिकेचे प्रणेते[संपादन]

सद्यःस्थितीत न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे व त्यांच्या माध्यमातून अन्यायाचे निराकरण करणे नागरिकांना सहजशक्य झाले आहे. माजी सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांना या जनहित याचिकांचे प्रणेते मानले जाते. भगवती यांनी १९७९मध्ये न्यायालयात सर्वप्रथम जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यात त्यांना न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्णा यांचे सहकार्य लाभले होते.पुष्पा हिंगोरानी यांनी पहिल्यांदा जनहित याचिका दाखल केली.

वादग्रस्त निकाल आणि पश्चात्ताप[संपादन]

देशात आणीबाणी लागू असताना जबलपूरचे ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट विरुद्ध शिवकांत शुक्ल या ‘हेबीयस कॉर्पस केस’मध्ये भगवती यांनी एक वादग्रस्त निकाल दिला होता. ‘आणीबाणीच्या काळात झालेल्या बेकायदेशीर अटकेला आव्हान देता येत नाही’ हाच तो विचित्र निकाल. हा असा निकाल दिल्याबद्दल भगवतींना ३० वर्षांनी पश्चात्ताप झाला.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार[संपादन]

  • भारत सरकारतर्फे २००७ सालचा पद्मविभूषण पुरस्कार.