देवाहुती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


देवाहुती ही ब्रह्मदेवाचा पुत्र स्वायंभुव मनु याची सुंदर कन्या होती. हिच्या आईचे नाव शतरूपा होते. देवाहुतीला जन्मतःच योगप्रक्रियेचे ज्ञान होते. कर्दम ऋषींच्या योगसामर्थ्याबद्दल तिने ऐकले होते. नकळत तिला त्यांची ओढ लागली. सरस्वती नदीकाठी त्यांच्या आश्रमात ती आईवडिलांबरोबर आली असता, त्यांनी देवाहुतीशी विवाह करायचा आग्रह कर्दमांना केला. 'मी तपस्वी, मला संसाराची इच्छा नाही, पण भगवान विष्णूच्या आज्ञेने मी तिचा स्वीकार करतो. मात्र हिला पुत्रप्राप्ती झाल्यावर मी संन्यास घेईन' या अटीवर कर्दम ऋषींनी देवाहुतीचा स्वीकार केला. पुढे देवाहुतीला कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गति, क्रिया, ख्याति, अरुंधती व शांति अशा नऊ कन्या झाल्या. त्यांची लग्ने अनुक्रमे मरीचि, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वसिष्ठअथर्वा या ऋषींशी झाली. सर्वच मुली झाल्या. त्यामुळे पतीला देवाहुतीने विनंती केली. 'आता मुली सासरी गेल्या, आपणही संन्यास घेणार, मग मी कुणाच्या बळावर जगू?' तिने विष्णूची भक्ती केली आणि त्याच्या कृपेने तिच्या उदरी स्वतः श्री विष्णूंनी पुत्ररूपाने जन्म घेतला. ह्या मुलाचे नाव कपिल होते. त्याच्या जन्मानंतर कर्दम ऋषींनी संन्यास घेतला.

कपिल मुनींचा जन्म सिद्धपुर या गावी झाला. ते नंतर जवळच असणाऱ्या बिंदुसर या गावी कायमचे राहाण्यास गेले. कपिलमुनींचे असामान्य ज्ञान व यौगिक सामर्थ्य पाहून देवाहुतीने त्यांना विनवणी केली, 'मी सारा जन्म भौतिक गोष्टींमध्ये गुरफटून राहिले. मला ब्रह्मज्ञान करून घ्यायची इच्छा आहे.' कपिल ऋषींनी आपल्या आईला ब्रह्मज्ञान दिले. मुलाकडून ज्ञानप्राप्ती करून ब्रह्मवादिनी होणारी देवाहुती ही बहुधा पहिलीच माता असावी.

कपिलमुनींनी पुढे सांख्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला.