दत्तू बांदेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्तात्रेय तुकाराम दत्तू बांदेकर (२२ सप्टेंबर, १९०९:कारवार, कर्नाटक, भारत - ४ ऑक्टोबर, १९५९:मुंबई) हे कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. काही काळ पुण्यात घालवल्यावर पुढे मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरलेला कुणी पाहिला नाही. मोठमोठ्या विद्वानांपासून ते अगदी गावंढळापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने लोभविले.

आचार्य अत्र्यांचे ते उजवे हात होते. १९३४साली आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, सुंदर मानकर आणि कॅप्टन मा.कृ.शिंदे यांनी ’साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ’ नावाचे साहित्यावर चर्चा करणारे मंडळ काढले होते. मंडळाच्या पहिलीच सभा विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्‍मयावर मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाली होती. तेव्हापासून अत्रे आणि बांदेकरांची मैत्री सुरू झाली.

जुलै १९४०पासून बांदेकर आचार्य अत्र्यांच्या साप्ताहिक नवयुगमध्ये ’रविवारचा मोरावळा’ नावाचे सदर लिहीत.

चित्रपट विषयाला वाहिलेल्या ’चित्रा’ साप्ताहिकात ते प्रूफरीडर म्हणून लागले. पुढे 'चित्रा'तून त्यांनी 'तो आणि ती ' आजकालचे गुन्हेगार, सख्याहरी ' ही सदरे लिहिली. त्यातील 'सख्याहरीला' हे त्याच्या 'प्रेयसीने लिहिलेली पत्रे ' हे स्वरूप होते. त्यातून सामान्य माणसांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या भानगडी यासंबंधी चुटपुटीत भाष्य असे. टवाळकीच्या ढंगात लिहिलेले सदर जितके लोकप्रिय झाले तितकेच टीकेचेही धनी झाले. पुढे अत्र्यांच्या 'नवयुग ' मध्ये ते दाखल झाले आणि अखेरपर्यंत तेथेच राहिले.तील ’सख्या हरी’ या टोपणनावाखाली प्रकाशित होणाऱ्या बांदेकरांच्या सदरामुळे ते महाराष्ट्राचे लाडके लेखक झाले. अत्र्यांच्या नवयुगमधून बांदेकरांनी लिहिलेली 'अक्काबाईचा कोंबडा', 'जग ही रंगभूमी', 'घारुअण्णांची चंची' ही सदरे लोकप्रिय झाली.

दत्तू बांदेकर स्वतः प्रसिद्धिपराङ्‍मुख होते. ते इतके लाजरे होते की कधी जनतेसमोर ते आले नाहीत. त्यांनी कुणालाही आपली मुलाखत घेऊ दिली नाही की आपला फोटो काढू दिला. पां.वा. गाडगीळ यांनी एका लेखात लिहिले आहे की, "दत्तू बांदेकर इतके लाजाळे आणि एकान्तिक होते की आचार्य अत्र्यांनी मुद्दाम बोलावून आणि एकोणीस वर्षे ’नवयुग’मध्ये त्यांची लहर सांभाळून त्यांना ठेवले नसते तर, लेखक म्हणून दत्तू बांदेकर कधीच संपले असते.

त्यांचे मित्र मा.कृ.शिंदे यांना दत्तू बांदेकरांच्या नृत्याभिनयाच्या गुणाची चांगली कल्पना होती. पण शिंदे यांनी कितीही आटापिटा केला तरी दत्तूला ते रंगमंचावर आणू शकले नाहीत. दत्तू बांदेकर यांनी लिहिलेले ’विचित्र चोर’ हे नाटक रंगमंचावर आले खरे, पण पहिल्याच प्रयोगात आपटले. त्या नाटकाच्या सर्व उपलब्ध प्रती बांदेकरांनी जाळून टाकल्या.

दत्तू बांदेकरांच्या ’जावई शोध’ या दुसऱ्या नाटकाचा मात्र प्रयोग झाला. या नाटकाची भाषा कोकणीमिश्रित मराठी असून त्यात बांदेकरांनी कारवारमधील काळू नदीचे आणि निसर्गसौंदर्याचे वर्णन केले आहे. १९५१ साली कारवारला अ.का. प्रियोळकर यांच्या अध्यक्षतेखाली जे मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यात या नाटकाचा प्रयोग झाला.

मित्रपरिवार[संपादन]

  • आचार्य अत्रे
  • शाहीर अमर शेख
  • ’सुगंध’ मासिकाचे संपादक श्री. एकबोटे
  • नंदन कालेलकर (लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात सलून काढणारा पहिला ’न्हावी’. त्यांचे ‘केशभूषा : शास्त्र आणि तंत्र’ हे पुस्तक १९५३ साली प्रसिद्ध झाले.)
  • अर्जुन सी. केळुस्कर - ’धनुर्धारी’ साप्ताहिकाचे संपादक
  • गद्रे
  • प्रभाकर गुप्ते
  • जुवेकर गुरुजी
  • बाळ ठाकरे
  • रमेश नाडकर्णी
  • ’आवाज’चे संस्थापक-संपादक मधुकर पाटकर
  • कॅ. मा.कृ.शिंदे - हे पत्रकार, लेखक, कवी, नाटककार, संपादक आणि अभिनेते होते.
  • सुंदर मानकर
  • अप्पा पेंडसे -पुरोगामी वृत्तीचे एक झुंझार पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ
  • ’अलका’ मासिकाचे संपादक श्रीकृष्ण पोवळे
  • वसंतराव मराठे
  • माधव रेडकर
  • रघुवीर रेळे
  • द.म. सुतार - हेही धनुर्धारीचे एक संपादक होते.

प्रकाशित वाङ्‌मय[संपादन]

दत्तू बांदेकर हे चित्रपट-नाट्य समीक्षणे अशा स्वरूपाचाही मजकूर लिहीत. राजकीय व वाङमयीन क्षेत्र हा बांदेकरांच्या विनोदाचा विषय असे. उपरोध तरल कल्पकता, हजरजबाबी कोटिबाजपणा आणि रंजकता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व लेखन कार्याचा आढावा घेणारे कारुण्याचा विनोदी शाहीर हे त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

पुस्तके[संपादन]

  • अतिप्रसंग (प्रस्तावना : चं. वि. बावडेकर, टिपण : अनंत काणेकर, मुखपृष्ठ : दीनानाथ दलाल) (१९४०),
  • अनिल
  • अमृतवाणी (लघुनिबंध, १९४८)
  • आडपडदा (१९४७)
  • आपकी सेवामे (हिंदी चित्रपटाची पटकथा, १९४७)
  • आर्य चाणक्य
  • आवळ्या भोपळ्याची मोट (१९५८)
  • कबुली जबाब (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
  • कारुण्याचा विनोदी शाहीर
  • गडी फू (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
  • गुंडाच्या तावडीतील सुंदरी (१९४६, रहस्यमालाचा दिवाळी अंक)
  • गुलछबूचा फार्स (दिवाळी अंकात)
  • चिरीमिरी (१९५९)
  • चुकामूक (लघु कादंबरी)
  • चोरपावले
  • जावईशोध (नाटक, १९५१)
  • तू आणि मी (आत्मकथन, १९४४)
  • तो आणि ती (संवाद, १९३८)
  • नजरबंदी (नाटक, १९४४)
  • नवी आघाडी (१९४४)
  • पंचगव्य (विडंबन काव्यसंग्रह, १९५७. या पुस्तकात बांदेकरांच्या ३६ कविता आहेत, बाकीच्या अत्र्यांच्या)
  • पेचपसंग (१९४७)
  • प्यारी (१९४४)
  • प्रेमपत्रे (१९४६)
  • प्रेमाचा गुलकंद (१९५९)
  • बहुरूपी (१९४१)
  • मोहनिद्रा (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
  • विचित्र चोर (नाटक, १९४३)
  • वितंडवाद
  • वेताळ प्रसन्‍न (१९६०, मृत्यूनंतर)
  • सख्याहरी (प्रस्तावना - प्र.के. अत्रे)
  • हिरवी माडी (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)

दत्तू बांदेकरांवर लिहिली गेलेली पुस्तके, लेख, नियतकालिके वगैरे[संपादन]

  • कारुण्याचा विनोदी शाहीर (लेखक - दत्तू बांदेकर)
  • ’दर्पण’चा दत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक (२००९)
  • आठवणीतील बांदेकर (मनोहर बोर्डकर)
  • दत्तू बांदेकर (चरित्र, लेखिका नेत्रा बांदेकर ऊर्फ नीलांबरी जोगीश)
  • निवडक दत्तू बांदेकर (अप्पा परचुरे)
  • सं.ग. मालशे संशोधन केंद्रातर्फे सादर करण्यात आलेला दत्तू बांदेकरांवरील शोधनिबंध, कविता महाजन, [१][permanent dead link]