ती फुलराणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. या नाटकात हयात असेपर्यंत भक्ती बर्वे मुंजुळेची भूमिका करीत. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष या मंजुळाची भूमिका करत. या चौघींनीही लेखक पु.ल.देशपांडे यांच्या मनातली मंजुळा रंगमंचावर साकारली.

नाटकाची संहिता बदलली[संपादन]

सुनीताबाई देशपांडे यांनी पुलंच्या सर्व नाटकांच्या प्रयोगाचे हक्क कलाकारांसाठी खुले केले असल्यामुळे ‘ती फुलराणी’ला कॉपीराइट कायदा लागू होत नाही. असे असले तरी पुलंनी लिहून ठेवल्याप्रमाणे
‘नाटकातला संवाद हा कवितेच्या ओळीसारखा असावा लागतो. चांगल्या कवितेच्या ओळीतले शब्द जसे बदलता येत नाहीत, तसे चांगल्या संवादातले. इब्सेन म्हणायचा, माझ्या संवादातला एक शब्द जरी तुम्ही इकडचा तिकडे केलात तर माझ्या वाक्यांना रक्त फुटेल’.

असे असूनही दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि हेमांगी कवी यांची मंजुळेची भूमिका असलेल्या नाटकाच्या बदल केलेल्या संहितेमुळे नाट्यरसिकांचा विरस झाला आहे. ‘ती फुलराणी’ नाटकाचा नवा प्रयोग संहितेपेक्षा वेगळाच होत असल्याची बाब ध्यानात आल्यामुळे नाट्यरसिकांमध्ये नाराजीची भावना आहे. पुलंचे मानसपुत्र आणि जागतिक कीर्तीचे गणितज्ञ दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांनी आपल्या भारतभेटीत हे नाटक पाहिले. त्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना नाटकाच्या नव्या रूपाला आक्षेप घेतला आहे.

या नाटकाच्या सादरीकरणातील बदलांबाबत ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, साहित्यिक रत्‍नाकर मतकरी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.

दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर म्हणाले, की ‘फार्सिकल करण्याच्या नादामध्ये ती फुलराणी नाटकाचा तोल बिघडला आहे’. हे नाटक मूळ संहितेनुसार होत नसल्याचे समजले तेव्हा जाणीवपूर्वक हा प्रयोग पाहिला. ‘हेमांगी कवी यांनी काम चांगले केले आहे. मात्र, विक्षिप्तपणा करून टाळ्या मिळविण्याचे प्रकार खटकण्याजोगेच आहेत. हे नाटक शब्दांवरचे आहे. पण, पुलंचे शब्द काढून काही ठिकाणी वेगळेच संवाद घुसडण्यात आले आहेत. गरज नसलेले संवाद आल्यामुळे ज्यांना शब्दांचे महत्त्व समजते त्यांचा विरस होतो. तुम्हाला पुलंचे शब्द नको असतील तर नव्याने नाटक लिहून घ्या आणि ते करा. मात्र, फुलराणी नाटकाबाबत जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे’, असेही ठाकूर म्हणाले.