डोर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोर
दिग्दर्शन नागेश कुकुनूर
निर्मिती इलाहे हेपतुल्ला
प्रमुख कलाकार आयेशा टाकिया, गुल पनांग, श्रेयस तळपदे, प्रतिक्षा लोणकर, गिरिश कर्नाड, उत्तरा भावकर
संकलन संजीव दत्ता
संगीत सलीम व सुलेमान मर्चंट
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}



डोर (बंधन) हा सन २००६ मधील नागेश कुकुनूर दिग्दर्शित चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका आयेशा टाकिया, गुल पनांगश्रेयस तळपदे यांची असून ही दोन स्त्रीयांची कथा आहे मीरा व झीनत, ज्या एका घटनेने बंध होतात. चित्रपट हा मूळ मल्याळी चित्रपट पेरुमाझाक्कालम वर आधारित आहे. हा चित्रपट व्यावसायिक यशात मागे पडला तरी याने चित्रपट रसिकांमध्ये चांगलीच वाहवा मिळवली. तसेच खासकरून महिलावर्गाकडून हा चित्रपट चांगलाच प्रशंसित झाला.

कथानक[संपादन]


मीरा ही राजस्थानमधील एका दुर्गम भागात राहणारी राजपुत घराण्यातील पारंपारिक स्त्री असते तर झीनत ही काश्मीर मधील एका मुस्लिम कुंटुबातील स्वतंत्र व्यक्तीमत्वाची स्त्री असते. दोघांचेही नवरे लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सौदी अरेबियात कामाला जातात व तिकडे दोघे मित्र बनतात. काही महिन्यानंतर सगळे सुरळित चाललेले असताना एके दिवशी मीराचा नवरा शंकर हा झीनतच्या नवऱ्याकडून एका दुर्घटनेत ठार होतो व सौदी अधिकारी झीनतच्या नवऱ्याला देहदंडाची शिक्षा देतात. परंतु सौदी कायद्याप्रमाणे जर झीनतच्या नवऱ्याने जर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून माफीपत्र आणले तर त्याच्या देहदंडाची शिक्षा माफ होउ शकत असते. परंतु झीनत पाशी शंकरचा एक फोटो सोडला तर काहीच माहिती नसते.

झीनत तिच्या नवऱ्याला देहदंडाच्या शिक्षेपासून वाचवण्याचा पण उचलते परंतु माहिती अभावी तिचा प्रवास अवघड असतो. काश्मीरहून राजस्थानमध्ये ती पोहोचते व मोठ्या प्रयत्नाने ती मीराचे घर शोधून काढते. याकामी तिला एक बहुरुप्या बरीच मदत करतो. मीराच्या घरी मीरा ही विधवा झाल्यामुळे तिचे आयुष्य एक विरामचिन्ह बनलेले असते. तिचे सर्व स्वातंत्र्य हिरवून घेतले गेलेले असते. झीनत तिच्या घरच्यांना माफी-पत्राची विनंती करतात परंतु ते धुडकावून लावतात व पुन्हा तसा प्रयत्न केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देतात. झीनत याही परिस्थितीत हार न मानता आपले काम चालू ठेवते.मीराला फक्त दुपारच्या वेळेत एका देवळात जाण्याची मुभा असते. मीराची दिनचर्या पाहून झीनत तिला देवळात गाठते गाठते व आपले नाव दुसरे सांगून तिच्याशी मैत्री वाढवते तिचे असे बाहुलिसारखे झालेले आयुष्य पाहून झीनतला कसे सेच वाटते व एक स्त्री म्हणून तिच्या परीने तिला नवऱ्याच्या मृत्युच्या दुःखातून बाहेर काढण्याचाही वसा घेते. तिच्या थांबलेल्या आयुष्याला चालना देण्याचे प्रयत्न करते. मीराला तिच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची जाणीव करून देते व तिच्या थांबलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा चैतन्य आणते. परंतु शेवटी झीनतला आपले उदिष्ट मीरापुढे उघड करावे लागते व मीराच्या टिकेला सामोरे जावे लागते.झीनत दयेसाठी मीरापुढे आर्जव करते. परंतु संतापाने तप्त झालेली मीरा तिची मागणी अपमानीत करून धुडकावून लावते.दरम्यान घरावरचे कर्ज माफ होण्यासाठी मीराचे सासरे मीराला गावाजवळ होणाऱ्या फॅक्टरीच्या मालकाला रखेल म्हणून देण्याचा निर्णय घेतात व ही बातमी मीराला समजते व पुन्हा शोकाच्या गर्तेत सापडते. त्यामुळे झीनतने जे काही केले त्या बद्दल तिला सहानूभूती निर्माण होते. हताश झीनत परत जात असतानाच, मीराला दुःख विसरून आयुष्यात चैतन्यमयी रहाणे किती गरजेचे आहे याची जाणीव होते व ती स्वता:हून माफीपत्रावर सही करून देते. त्याचबरोबर अश्या पारंपारिक गावात व पैश्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणाऱ्या सासू सासऱ्यांच्या घरात तिची घुसमट होईल याचीही जाणीव होते व झीनतच्या मैत्रीमध्ये आपले पुढील आयुष्य शोधते.

भूमिका[संपादन]