जब्बार पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जब्बार पटेल
जब्बार पटेल
जन्म जब्बार रझाक पटेल
२३ जून, इ.स. १९४२
पंढरपूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ इ.स. १९७३ पासून पुढे
भाषा मराठी, हिंदी
पुरस्कार गंगाधर गाडगीळ पुरस्कार
पत्नी मणी
अपत्ये मुली - जस्मिन, जोनाकी

जब्बार रझाक पटेल (जन्म : पंढरपूर, महाराष्ट्र (भारत), २३ जून, इ.स. १९४२) हे मराठी चित्रपटसृष्टीतीलहिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत.[ संदर्भ हवा ]

बालपण[संपादन]

जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आले. त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसविलेले ’चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली.[ संदर्भ हवा ]

पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात विजय तेंडुलकर आले. त्यांची काही नाटके त्यांनी वाचली. ही आणि इतर नाटके बसवताना आगळेवेगळे प्रयोग केले. उदा० तेंडुलकरांची ’बळी’ ही एकांकिका किंवा ’श्रीमंत’ हे नाटक. असेच काही प्रयोग त्यांनी नाट्यलेखनातही केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बऱ्याच नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली.[ संदर्भ हवा ] तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांचे ’अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजले. त्यानंतर त्यांना ’घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाले. हे नाटक खूप गाजले.[ संदर्भ हवा ]

जब्बार पटेल यांच्या मेडिकल कॉलेजातील सहाध्यायींमध्ये अनिल अवचट, कुमार सप्तर्षी यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्‍नीने प्रॅक्टिससाठी पुण्याजवळचे दौंड हे गाव निवडले. जबार पटेल हे बालरोगतज्ज्ञ आणि त्यांची पत्‍नी स्त्री-रोगतज्ज्ञ. वडील रेल्वेत होते, म्हणून निदान रेल्वेतील माणसे त्यांच्या दवाखान्यात येतील अशी अपेक्षा होती. हळूहळू प्रक्टिसमध्ये जम बसू लागला. पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ’घाशीराम’च्या तालमींसाठी पुण्यात यायचे. असे साडेतीन महिने चालू होते.[ संदर्भ हवा ]

चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात[संपादन]

एके दिवशी जब्बार पटेल यांना भेटायला चित्रकलेचे शिक्षक आणि वात्रटिकाकार कवी रामदास फुटाणे आले. त्यांनी समोर ’सामना’ चित्रपटाची पटकथा ठेवली, आणि म्हणाले,”आपण यावर चित्रपट काढायचा आहे!" तेंडुलकरांची संमती होतीच. आणि जब्बार पटेल हे ’सामना’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक झाले. (इ.स. १९७४)[ संदर्भ हवा ]

कारकीर्द[संपादन]

डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.[ संदर्भ हवा ] अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे.[ संदर्भ हवा ]x २०११ मध्ये ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या चित्रपटनिर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी स्पष्ट केले की, "पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळे चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपटनिर्मितीच्या निमित्ताने ११ व्यक्तींच्या गटासह चैत्यभूमी(दादर)सह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपटनिर्मिती शक्य नाही."[ संदर्भ हवा ]

डॉ, जब्बार पटेलांनी थिएटर ॲंकेडमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे.[ संदर्भ हवा ]

इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे.[ संदर्भ हवा ] जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. सध्या(२०१२)ते महात्मा फुलें यांच्यावर चित्रपट काढण्यात गर्क आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत.[ संदर्भ हवा ]

वैयक्तिक जीवन[संपादन]

डॉ. जब्बार पटेल यांची पत्‍नी डॉक्टर आहे. त्यांना दोन मुली आहेत.[ संदर्भ हवा ]

जब्बार पटेल यांची भूमिका असलेली नाटके[ संदर्भ हवा ][संपादन]

  • तुझे आहे तुजपाशी
  • माणूस नावाचे बेट
  • वेड्याचे घर उन्हात
  • तीन पैश्याचा तमाशा
  • घाशीराम कोतवाल

जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट[ संदर्भ हवा ][संपादन]

  • डॉ बाबासाहेब आंबेडकर (२०००)
  • मुक्ता (१९९४)
  • एक होता विदूषक (१९९२)
  • महाराष्ट्र (१९८६)
  • मुसाफिर (१९८६)
  • उंबरठा (१९८२)
  • सिहासन (१९७९)
  • जैत रे जैत (१९७७)
  • सामना (१९७४)

जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले लघुपट[ संदर्भ हवा ][संपादन]

  • कुमार गंधर्व (हंस अकेला) (२००५)
  • फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र (१९९०)
  • इंडियन थिएटर (१९९०)
  • कुसुमाग्रज
  • पथिक (१९८८)
  • मी एस.एम. (१९८७)
  • लक्ष्मणराव जोशी (१८८९)

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

पत्रकारांशी ‘गप्पागोष्टी’त शंभर मिनिटे रमले डॉ.जब्बार पटेल![permanent dead link]