चर्चा:मूळव्याध

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे लिहिलेले अनेक उपाय यशस्वी सिद्ध झालेले नसून त्याला संदर्भाची गरज आहे --आभिजीत २१:५२, ११ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

मुळव्याध लेखातून हलविलेली माहिती खाली आहे.

अभय नातू (चर्चा) १२:२३, २५ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]


मूळव्याध (मोड किंवा पाईल्स) म्हणजे गुदद्वाराच्या तोंडाशी असलेल्या नीलांना सूज येऊन रक्त साठून राहणे. ही सूज कमीजास्त असेल त्याप्रमाणे मोड अथवा कोंब येतात. मधूनमधून या मोडांना इजा होऊन रक्त बाहेर येते. या सूज येण्यामुळे तिथला भाग नाजूक होऊन शौचाच्या वेळेस आग होणे, दुखणे वगैरे तक्रारी निर्माण होतात.

मूळव्याध हा बहुधा मध्यमवयानंतर येणारा आजार आहे. गरोदरपणातदेखील असे मोड येतात, पण बाळंतपणानंतर ते बरे होतात.

ज्यांना कायम बध्दकोष्ठ असेल त्यांना कुंथण्यामुळे रक्तवाहिन्या दाबल्या जाऊन मूळव्याध होण्याची शक्यता असते.


व्याधीची कारणे

   पचायला जड, जळजळ करणाऱ्या पदार्थांचे सेवन.
   अर्धवट शिजलेल्या अन्नाचे सेवन.
   गाय, डुक्कर, बकरी वगैरे प्राण्यांचे मांससेवन.
   मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे अति सेवन.
   अति मद्यपान, जड पाण्याचे सेवन.
   वेळच्या वेळी शरीरशुद्धी न करणे.
   अनुचित व्यायाम व मैथुनकर्म.
   दिवसा झोपणे.
   कडक वा विषम आसनावर अधिक काळ बसणे.
   अति वेगवान गाडीत बसून वारंवार प्रवास करणे.
   प्रवर्तन होताना कुंथावे लागणे.
   बाळंतपणाच्या वेळेस फार जोर लावावा लागणे.
   गर्भारपणाच्या शेवटी शेवटी गुदप्रदेशावर दाब पडणे. 

रोगनिदान

मूळव्याधीचे मोड दिसत असल्यास इतर तपासणीची आवश्यकता नसते. पण काही वेळा हे मोड आतच राहतात. यासाठी गुदद्वाराची एका लहान नळीमधून तपासणी करावी लागते. कधी कधी मोडाच्या मागे आत गुदद्वारव्रण असण्याची शक्यता असते. बाहेर फक्त रक्तस्राव दिसतो. या तपासणीसाठी डॉक्टरकडे पाठवावे.

उपचार

आधी बध्दकोष्ठ असल्यास त्याचा उपचार करावा. मूळव्याध हा चिवट आजार आहे.

- मूळव्याध दुखत असताना वेदनाशामक मलम लावल्यास तात्पुरता आराम मिळतो. गरम पाण्यात बसून शेक घेतल्याचाही फायदा होतो.

- मूळव्याधीवर तज्ज्ञांकडून तपासणी करून शस्त्रक्रियेबद्दल सल्ला घ्यावा. दोरा किंवा रबरबँडने मोड बांधणे, मोड शस्त्रक्रियेने काढून टाकणे किंवा सुजलेल्या वाहिन्यांमध्ये इंजेक्शन देणे, इत्यादी उपाय केले जातात.

   मूळव्याधीवर सुद्धा त्रिदोष, व्यक्‍तीची प्रकृती, रोगाची तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून नेमक्‍या औषधांची योजना करावी लागते, तरीही यावर सर्वसाधारणतः केले जाणारे उपचार याप्रमाणे-
  1)  रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यावे.
  2)  मोडाच्या ठिकाणी वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठाचूर्ण मिसळून घ्यावे किंवा सुंठ व पाठाचूर्ण एकत्र करून घ्यावे.
  3)  सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी, फुलका, तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.
  4)  रक्‍त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे.
  5)  मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दूर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी.
  6)  मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी.
  7) कफज मूळव्याध असून मोडाला खाज येत असल्यास जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर सुंठ व ओव्याची पूड टाकून ताक प्यावे.
  8)  मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा.
  9)  तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते.
  10)  व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवर योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणे व पथ्य पाळणे आवश्‍यक असते; अन्यथा पुन्हा त्रास उद्भवू शकतो. 

आयुर्वेद

मूळव्याध या आजारावर इलाज करताना त्याची कारणे समजावून त्यांचे निराकरण करणे आवश्यक असते. ब-याच वेळा मूळव्याधीचे कारण म्हणजे भूक नसताना केवळ चमचमीत पदार्थाच्या ओढीने खाणे, पचनशक्ती कमी असताना तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ, विशेषत: डाळी, गहू व मांसाहारी पदार्थ सतत खाणे असते. मळ कडक होऊन बध्दकोष्ठ होणे हेही कारण असू शकते. मूळव्याधीच्या मागे ही कारणे असतील तर त्यांचे नियंत्रण आधी आवश्यक आहे.

पेरू, पपई, केळे, इत्यादी फळे रात्रीच्या जेवणानंतर घेण्याची सवय ठेवावी.

मळाचा कडकपणा कमी होण्यासाठी बहाव्याच्या शेंगेतला मगज लहान आकाराच्या गोटीइतका (तीन ग्रॅ.) करून पेलाभर पाण्यात कुस्करून रात्री घ्यावा.

वात प्रवृत्ती व्यक्तींनी त्रिफळा चूर्णासारखी विरेचक औषधे तुपाच्या बरोबर घ्यावी, नाही तर अन्नमार्ग कोरडा पडतो.

सुरण आणि ताक हे पदार्थ मूळव्याधीच्या प्रवृत्तीला थांबवणारे आहेत. चांगला शिजलेला सुरण आहारात असणे उपयोगी ठरते. भरपूर घुसळलेले ताक (200-250मि.ली.) जेवणानंतर घेणे चांगले.

पचनशक्ती सुधारण्यासाठी अर्शोघनवटी हे औषध किंवा गोळया घ्याव्यात. यात बिब्बा हा घटक असतो.

कांकायनवटी हे औषध बिन रक्तस्रावाच्या मूळव्याधीत उपयोगी असते, याची 250 मि.ग्रॅ. ची गोळी दिवसातून 2 वेळा 7 ते 10 दिवस द्यावी.

मूळव्याधीबरोबर रक्त पडत असेल तर कुटजघनवटी 500 मि.ग्रॅ. सकाळी व सायंकाळी रक्त थांबेपर्यंत रोज द्यावी.

किंवा याऐवजी नागकेशर 500 मि.ग्रॅ. दिवसातून तीन वेळा 4 ते 5 दिवस द्यावे. नागकेशरामुळे बहुधा 24 तासांत रक्त थांबते. (नागकेशर हा नागचाफ्याच्या फुलावरील केसर असतो.)

होमिओपथी निवड

नायट्रिक ॲसिड, आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, सीना, हेपार सल्फ, लॅकेसिस, लायकोपोडियम, मर्क्युरी कॉर, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पोडोफायलम, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर, थूजा.