गौरीशंकर उदयशंकर ओझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौरीशंकर उदयशंकर ओझा

गौरीशंकर उदयशंकर ओझा (१८०५-१८९२) हे गुजरातमधल्या पूर्वीच्या भावनगर संस्थानाचे दिवाण होते. एकोणिसाव्या शतकातल्या गुजरातमधल्या त्यांच्या प्रशासकीय कामाबद्दल, त्यांच्या संस्कृत लिखाणाबद्दल, आणि नंतरच्या काळात एक संन्यासी म्हणून ते परिचित झाले.

कार्य[संपादन]

गौरीशंकरांचा जन्म गुजरातमधील घोघा गावात एका ब्राम्हण कुटुंबात झाला.[१] १८७० ते १८७७ या काळात भावनगरचे संस्थानिक तख्तसिंह गोहिल वयाने लहान असल्यामुळे संस्थानाचा शासकीय कारभार गौरीशंकर यांनी चालवला. त्या काळात त्यांनी भावनगरच्या प्रशासनात, न्यायव्यवस्थेत, टपाल व्यवस्थेत, व कर व्यवस्थेत अनेक सुधारणा घडवून आणल्या. राजकोटमधले राजकुमार कॉलेज, राजस्थानिक न्यायालय, अनेक इस्पितळे, व पाणी पुरवठ्यासाठी गौरीशंकर किंवा बोर तलाव यांची स्थापना केली. १८५० च्या दशकात गौरीशंकरांनी अनेक गुजराती भाषेतील शाळा स्थापन केल्या. १८७८ मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या बरोबर गौरीशंकरांनी मीठावर ब्रिटीशांनी बसवलेल्या कराचा विरोध केला. १८५७ मध्ये भावनगरची पहिली मुलींची शाळा गौरीशंकरांनी स्थापन केली. त्यांना भारतातील ब्रिटीश सरकारकडून १८७७ मध्ये ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा पुरस्कार देण्यात आला. १८७९ मध्ये निवृत्तीनंतर गौरीशंकरांनी स्वरूपानुसंधान या नावाचे पुस्तक संस्कृतमध्ये लिहीले. या पुस्तकात वेदांताचे उद्बोधन केले आहे. या पुस्तकाचे संपादन झवेरीलाल उमाशंकर ओझा यांनी केले व इंग्रजी व गुजराती भाषेतील प्रस्तावनांसह प्रकाशीत केले. या पुस्तकाचे मॅक्स म्युलर यांनी १८८४ मध्ये वेदांतावरचे एक महत्त्वाचे पुस्तक अशी प्रशंसा केली. १८८७ मध्ये चतुराश्रम पद्धतीप्रमाणे गौरीशंकर यांनी संन्यास घेतला. यानंतर ते स्वामी सच्चिदानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. तत्कालीन भारताच्या वैचारिक विश्वात स्वामी सच्चिदानंदांनी मोठे योगदान दिले. गौरीशंकरांची १८८९ व १९०३ मध्ये चरित्रे प्रसिद्ध झाली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ The Quarterly Review of Historical Studies. vol 22. Calcutta, Institute of Historical Studies. 1982–1983 [1961]. p. 32. ISSN 0033-5800. OCLC 1774418.