कस्तुरबा गांधी
| कस्तूरबा मोहनदास गांधी | |
|---|---|
| ११ एप्रिल,१८६९ ते २२ फेब्रुवारी, १९४४ | |
| टोपण नाव: | बा |
| धर्म: | हिंदू |
कस्तुरबा गांधी (११ एप्रिल,१८६९ ते २२ फेब्रुवारी, १९४४), महात्मा गांधी यांच्या पत्नी. सर्वजण प्रेमाने त्यांना बा संबोधित करीत.
गोकुळदास माखर्जी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तूरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहा-वाचायला शिकवले — त्यावेळेसच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेंव्हा गांधीजीं विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले तेंव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरीलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणीलाल १८९२, रामदास १८९७ आणि देवदास १९००.
१९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्ह्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असुनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहील्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असुनही, आपल्या पतिप्रमाणेच त्यांनी जातीभेदाचा त्याग केला व सर्व जातीधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहील्या.
कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४- १९१२ पर्यंत त्या डर्बन जवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या.१९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महीन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्यानंतरच्या काळात भारतामध्ये महत्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनीच चळवळीचे कार्य सांभाळले.१९१५ मध्ये गांधीजी नीळ-उत्पादक शेतक-यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा भारतात परतले तेंव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतक-यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले.