आयसी ८१४चे अपहरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयसी ८१४चे अपहरण
इंडियन एरलाइन्स IC ८१४ विमानासमोर तालिबानी दहशतवादी
अपहरण सारांश
तारीख २४ डिसेंबर, १९९९
स्थळ काठमांडु (नेपाळ) ते अमृतसर, लाहोर, दुबई मार्गे अफगाणिस्तानात कंदहर
प्रवासी १७८
कर्मचारी १५
जखमी १७
मृत्यू १ (रुपीन कत्याल)
बचावले १९२
विमान प्रकार एर बस ए-३००
वाहतूक कंपनी इंडियन एरलाइन्स
विमानाचा शेपूटक्रमांक VT-EDW
पासून त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ काठमांडू
शेवट इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली (भारत)
इंडियन एरलाइन्स

इंडियन एरलाइन्स IC ८१४ विमानाचे अपहरण : इंडियन एरलाइन्सच्या आयसी ८१४ विमानाचे, काठमांडू (नेपाळ) ते दिल्ली (भारत) या प्रवासादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून २४ डिसेंबर १९९९ रोजी १७८ प्रवाशांसोबत अपहरण करण्यात आले. आयसी ८१४ हे एरबस ए-३०० जातीचे विमान होते. २४ डिसेंबर १९९९ रोजी ते नेपाळची राजधानी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाहून, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले. भारतीय प्रमाणवेळ १७:३० च्या सुमारास सशस्त्र दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेतला. दिल्ली या नियोजित गंतव्याऐवजी विमानाला अमृतसर, लाहोर, दुबई मार्गे अफगाणिस्तानात कंदहार येथे उतरवले. दरम्यान दहशतवाद्यांनी एका प्रवाशाची हत्या केली तर काही जणांना जखमी केले. अफगाणिस्तानात त्यावेळी तालिबानची सत्ता होती. यामुळे भारताला अपहरणकर्त्यांसोबत वाटाघाटींदरम्यान अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय सशस्त्र दलांनी काही कारवाई करू नये यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनी विमानाला घेराव घातला. अखेर ७ दिवसांनी भारतातर्फे ३ दहशतवाद्यांना सोडून दिल्यावर हे अपहरण नाट्य संपले. भारताने सोडून दिलेले ३ दहशतवादी पुढील प्रमाणे - मुश्ताक अहमद झरग‍र, अहमद ओमार शेख, आणि मौलाना मसूद अझहर.

अपहरण[संपादन]

आयसी ८१४ हे विमान डिसेंबर २४ १९९९ला नेपाळहून भारताच्या प्रवासास निघाले होते. विमानात प्रामुख्याने भारतीय असणारे १७८ प्रवासी होते. भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यावर थोड्याच वेळात साधारण १७:३० च्या सुमारास ५ दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले. अनिल शर्मा जे IC ८१४ चे मुख्य फ्लाइट अटेन्डंट होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चेहऱ्यावर मास्क आणि चष्मा असणारया दहशतवाद्याने कॅप्टन देवी शरण यांना विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिली व पश्चिमेला उडत राहण्यास सांगितले. भारताने या ५ दहशतवाद्यांची दिलेली माहिती पुढील प्रमाणे.

  1. इब्राहिम अझहर, बहावलपुर, पाकिस्तान
  2. शाहिद अख्तर सईद, कराची, पाकिस्तान
  3. सनी अहमद काझी, कराची, पाकिस्तान
  4. मिस्त्री झहुर इब्राहिम, कराची, पाकिस्तान
  5. शकिर, सुक्कुर, पाकिस्तान

हे दहशतवादी एकमेकांना शेफ, बर्गर, डॉक्टर, शंकर, भोला या नावांनी संबोधित होते.(Chief, Burger, Doctor, Shankar and Bhola). पुढे दहशतवाद्यांनी कॅप्टन देवी शरण यांना लखनौ वरून विमान वळवून पाकिस्तानच्या लाहोर शहराकडे नेण्यास सांगितले. पण देवी शरण यांनी विमानात लाहोर पर्यंत जाण्याचे इंधन नाही या असे सांगुन भारतातच अमृतसर येथे उतरण्यास दहशतवाद्यांना तयार केले.

अमृतसर[संपादन]

अमृतसर विमानतळावर कॅप्टन देवी शरण यांनी (पर्यायाने दहशतवाद्यांनी) विमानात इंधन भरण्याची मागणी केली. पंजाब पोलीस दलाने सशस्त्र कारवाईची तयारी केली. पण त्यांना दिल्लीकडून परवानगी मिळाली नाही. तर दिल्लीहून एन एस जी कमांडोंचे पथक येई पर्यंत विमानास उड्डाण करण्यास आडकाठी करण्यास, वेळकाढू धोरण घेण्यास सांगण्यात आले. त्यासाठी इंधनाचा टँकर विमानासमोर धावपट्टी वरच उभा करण्याची योजना होती. पण विमानाकडे येणारा इंधनाचा टँकर अचानक थांबल्याचे पाहून दहशतवाद्यांचा संशय बळावला. त्यांनी कॅप्टन देवी शरण यांना विमान आहे त्याच स्थितीत उडवण्यास धमकाविले.दरम्यान अतिरेक्यांनी रुपीन कत्याल नावाच्या तरुणाला भोसकून जखमी केले. टँकर धावपट्टीवर उभा असल्याने धावपट्टी अपुरी होती. अखेर उड्डाणाची परवानगी न घेताच, टँकर धावपट्टीत उभा असतानाच कॅप्टन देवी शरण यांना अपुऱ्या धावपट्टी वरून विमान उडविले. यावेळी टँकर व विमान यांची टक्कर काही फूटांनीच टळली. अखेर दहशतवाद्यांनी विमान त्यांच्या योजनेप्रमाणेच लाहोर येथे नेण्यात सांगितले.

लाहोर[संपादन]

लाहोर विमानतळावर उतरण्याची परवानगी पाकिस्तानने सरळ दिली नाही. सुरुवातीस त्यांनी नकार दिला आणि विमान दुसरीकडे घेऊन जाण्यास सांगितले. पण आता विमानातील इंधन खरच कमी झाले होते. कॅप्टन देवी शरण यांनी लाहोरला उतरण्याची परवानगी मागितली. पण विमानतळावरील नियंत्रकाकडून प्रतिसाद मिळणे बंद झाले. तसेच त्यांनी विमानतळावरील हवाई वाहतूक बंद करून सर्व दिवे बंद केले. ज्यायोगे विमानास उतरण्यास धावपट्टी दिसणार नाही. या प्रकारापासून अनभिन्न कॅप्टन देवी शरण यांनी विमानतळावरील नियंत्रकाकडुन प्रतिसाद मिळत नाही तर स्वतः दिव्यांचा मागोवा घेत उतरण्याचा प्रयत्न केला. पण विमान खाली आणल्यावर त्यांना समजले की ज्याला ते विमानतळाची धावपट्टी समजुन उतरण्याचा प्रयत्न करत आहेत तो शहरातील रस्ता होता. विमानाचा हा प्रकार पाहून विमानतळ नियंत्रकाने त्यांना विमानतळावर उतरण्याची परवानगी दिली. त्यानंतर मात्र विमानाला इंधन पुरवठा ही करण्यात आला व पुन्हा उड्डाण भरण्यास परवानगी ही मिळाली. कॅप्टन देवी शरण यांनी काही महिला व मुलांना लाहोर मध्येच उतरु देण्याची मागणी केली. ही मागणी पाक अधिकाऱ्यांनी फेटाळली. यानंतर अतिरेक्यांनी विमान दुबई कडे वळवले.

दुबई[संपादन]

दुबई मध्ये दहशतवाद्यांनी विमानातील २७ प्रवाशांना सोडून दिले. तसेच या वेळेदरम्यान अतिरेक्यांनी रुपीन कत्याल नावाच्या तरुणाला भोसकून जखमी केले होते तो मरण पावला होता, त्याचे प्रेत सोडण्यात आले. यानंतर अतिरेक्यांनी विमान कंदहारकडे नेण्यास सांगितले.

कंदाहार[संपादन]

कंदाहार आणि अफगाणिस्तानातल्या बराचश्या भागावर तेव्हा तालिबानचा प्रभाव होता. अपहृत विमान कंदहारला पोहोचताच तालिबानने वाटाघाटीत मध्यस्ताची भूमिका घेतल्याचे भासवले. पण प्रत्यक्षात त्यांनी भारताने प्रवाशांना सोडवण्याचे लष्करी प्रयत्न करू नयेत यासाठी हत्यारबंद तालिबानी सैनिकांचा विमानाला वेढा घातला. याबाबत मात्र, अतिरेक्यांनी आणखी प्रवाशांना मारु नये यासाठी हे उपाय असल्याचे स्पष्टीकरण दिले. तालिबानच्या अशा भूमिकेमुळे भारताला पुढील वाटाघाटी ही जड गेल्या.

रात्रि कंदाहार विमानतळ

वाटाघाटी[संपादन]

अपहरण करणाऱ्या अतिरेक्यांनी प्रवाशांच्या सुटकेच्या मोबदल्यात भारतात अटकेत असलेल्या ३५ इस्लामी अतिरेकी यांची सुटका आणि रोख २० कोटी डॉलर रक्कम देण्याची मागणी केली. भारताकडून ही मागणी मान्य होने शक्य नव्हते. त्यामुळे वाटाघाटी चालूच राहिल्या. तालिबानच्या अस्तित्वामुळे भारताला जास्त कणखर भूमिका घेता येत नव्हती.

२७ डिसेंबरलाच भारताचे पथक वाटाघाटी करण्यासाठी कंदहारला पोहोचले. या पथक विमानाच्या खालील भागात एन.एस.जी. कमांडो लपवुन आणण्यात आले होते. संधी साधुन सशस्त्र कारवाई करत प्रवाशांना सोडवण्याचीच भारताची भूमिका होती. पण कंदाहार विमानतळावरील परिस्थिती पाहून ही योजना गुंडाळावी लागली. भारताच्या वाटाघाटी पथकातले अजित देवल याबाबतीत म्हणतात. -- " कंदाहारला उतरताच आम्हाला लक्षात आले की आपण तालिबान्यांकडून घेरलेलो आहोत. त्यांच्याकडे विविध प्रकारची शस्त्रे होती. त्यांनी घेतलेली पोझिशन्स विमानाच्या रक्षणासाठी घेतली जाणारी नव्हती, ती जणु हल्ल्याच्या प्रतिकारासाठी असल्यासारखे भासत होते." "Immediately after we landed there, we found that we were surrounded by Taliban irregulars - shabbily dressed people carrying various types of weapons. They had taken positions in such a way that is not the conventional tactical positions for protection of an aircraft. It was almost like offensive positions," remembers Ajit Doval, the key negotiator for the Indian team.

या वाटाघाटी ५ दिवस चालल्या. इकडे भारतात सरकारवरचा दबाव वाढत होता. विमान कुठल्याही मदतीविना, देखभालीशिवाय कंदहार मधे उभे होते. १६२ प्रवासी आत कोंडलेल्या अवस्थेत होते. आतील वातावरण कोंदट बनून प्रवाशांना त्रास होत होता. विमानातले स्वच्छतागृह भरून वाहत होते त्याचा वास संपूर्ण विमानात पसरला होता.

विमानाच्या अपहरणाचे प्रकरण प्रसारमाध्यमांकडून ज्याप्रकारे हाताळले गेले त्याबाबत वेगवेगळ्या भूमिका आहेत. लांब चाललेल्या वाटाघाटी बघुन भारत सरकार काहीच करत नसल्याचा भास निर्माण झाला. अपहृत प्रवाशांच्या नातेवाईकांचे आक्रोश प्रसार माध्यमांतून वारंवार दाखवले जात होते. रुपीन कत्याल मरण पावला असून त्याची नववधू अजून विमानातच आहे सुद्धा बातमी त्यातच अचानक अपहृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत घुसून गोंधळ घातला. हे सर्व सरकारवरचा दबाव वाढवत होते. अखेर पंतप्रधान वाजपेयींनी घोषणा केली की नवीन वर्षात कोणीही (अपहृत) बंदी असणार नाही,यावेळी नवीन वर्षाला केवळ काही दिवस बाकी होते. अखेर ३१ डिसेंबरला भारताने ३ दहशत वादी सोडण्याची घोषणा क‍रत हे अपहरण नाट्य संपले. मुश्ताक अहमद झरग‍र, ओमार शेख आणि मौलाना मसूद अझहर या तिघांना घेउन भारताचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग कंदहारला गेले. हे तीनही अतिरेकी तेथून लवकरच गायब होऊन काही दिवसातच पाकिस्तानातच वावरु लागले.

इतिहासावरील परिणाम[संपादन]

भारताने जे ३ दहशतवादी सोडले त्यांनी त्यांच्या दहशतवादी कारवाया लवकरच सुरू केल्या व जगाच्या इतिहासात ठळक पणे नोंदलेल्या दहशतवादी कारवाया घडवल्या.

  • मुश्ताक अहमद झरग‍र : जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना , डिसेंबर २००१ मध्ये या संघटनेने भारताच्या संसदेवर हल्ला केला.
  • अहमद ओमार शेख : ९/११ च्या दहशतवादी हल्यात सहभाग. डॅनियल प‍‍र्ल या पत्रकाराची पाकिस्तानात कॅमेरासमोर गळा चिरून हत्या. याच प्रकरणात अटक.
  • मौलाना मसुद अझहर : पाकिस्तानात दशवाद्यांना प्रशिक्षण.