आमनेर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आमनेरचा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)


आमनेरचा किल्ला
नाव आमनेरचा किल्ला
उंची फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण अमरावती जिल्ह्याच्या धारणी, महाराष्ट्र
जवळचे गाव धारणी तालुका
डोंगररांग टेकडीवजा उंचवट्यावर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


आमनेरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्ह्याच्या धारणी या भागात असलेला हा किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

वर्धा नदी, जाम नदी, वसिष्ठा नदी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हा आहे. आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर किल्ला हा एक अपरिचित असा किल्ला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला आमनेरचा किल्ला महाराष्ट्रातील विदर्भामध्ये मोडतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वायव्येला हा किल्ला आहे. अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये हा किल्ला आहे.

कसे जाल ?[संपादन]

आमनेरचा किल्ला तापीनदी आणि गडगा नदी यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर बांधलेला आहे. आमनेर किल्ल्याच्या जवळचे गाव म्हणजे भोकरबर्डी हे होय. भोकरबर्डी हे गाव बुऱ्हाणपूर ते अमरावती (धारणी मार्गे) या मार्गावर आहे.आमनेरला जाण्यासाठी दोन मार्ग ओत. पहीला मार्ग म्हणजे जळगाव-भुसावळ-बुऱ्हाणपूर-भोकरबर्डी असा आहे. दुसरा मार्ग अमरावती-परतवाडा-सेमाडोह-धारणी-भोकरबर्डी असा आहे.भोकडबर्डीमध्ये शाळा आहे. ही शाळा धारणी-बुऱ्हाणपूर या गाडी मार्गावर आहे. धारणीकडून आल्यावर शाळा डावीकडे लागते. या शाळेच्या समोरूनच एक कच्चा मार्ग जातो. या कच्च्या मार्गाने दोन किलोमिटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूच्या माळरानावर मारूतीचे लहानसे मंदिर आहे. येथून आमनेर किल्ला दिसू लागतो. येथील पाऊलवाटेने पुढे चालत गेल्यावर गडगा नदीचे पात्र आडवे येते. नदी पात्रातून पाणी कमी असल्यास नदी ओलांडण्यास अडचण येत नाही. नदीला पाणी असल्यास नदी ओलांडणे धोकादायक ठरु शकते.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गडगा नदीच्या काठावरून आमनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. या किल्ल्याला आमनेर हे नाव जवळ असलेल्या आमनेर गावावरून मिळाले आहे. हे आमनेर गाव ब्रिटीश आमदनीत उठून गेले. गाव उठून गेल्यामुळे त्या गावाची वाटही मोडून गेलेली आहे.गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरुज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीमधून गड प्रवेश होतो.गडाच्या मध्यभागी मारुतीचे लहान मंदिर आहे. त्यामागे वाड्याचे मोठे जोते शिल्लक असून त्याला मोठे तळघर आहे. चौकोनी आकाराच्या या छोट्याशा आटोपशीर किल्ल्याचे क्षेत्रफळ अगदी कमी आहे. त्यातूनही आत असलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत.या किल्ल्यास ८ बुरुज असून त्यापैकी ७ शाबुत आहेत. नदीतील पाण्याच्या माराने एक बुरुज भग्न झाला आहे.काळ्या पाषाणात वितळविलेले शिसे ओतुन याचा पाया मजबुत करण्यात आलेला आहे.यात जोडांसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे.हा किल्ला १२व्या ते १३व्या शतकापासुन अस्तित्वात असावा. तीनही बाजुस पाणी आणि एका बाजुस खंदक अशी या किल्ल्याची रचना आहे.या किल्ल्यावर शिवाचे मंदिर आहे. यास सोमेश्वर म्हणतात.सन १७६९ साली या किल्ल्यावर पेशव्यांचा मुक्काम झाला होता असे इतिहासकार सांगतात.

गुप्तधनाच्या आशेने अनेक ठिकाणी खोदकाम केलेले दिसते. गडाचा मुख्य मार्ग उत्तराभिमुख असून त्या मार्गावरील दरवाजा नष्ट झाला आहे. तटबंदीही बरीचशी ढासळलेली आहे. चार कोपऱ्याला चार आणि मधे दोन दोन बुरुज मिळून किल्ल्याला एकंदरीत बारा बुरुज आहेत. तापी आणि गडगाच्या संगमाकडील बुरुजावरून नदीचे उत्तम दर्शन होते. या बुरुजाच्या आतील बांधकामामध्ये राहण्याची सोय केलेली दिसते. याच तटबंदीमध्ये तापीनदीकडे जाणाऱ्या मार्गावर एक दिंडी दरवाजा आहे. ती वाट मोडल्यामुळे अवघड झालेली आहे.

  • आमनेरचा किल्ला नेमका कोणी व केव्हा बांधला याबाबत इतिहास कळत नाही. बाहेरून सुरेख दर्शन देणारा हा किल्ला आतून मात्र मरणपंथाला लागलेला दिसतो.