अहमदशाह अब्दाली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अहमदशाह अब्दाली हा अफगाण बादशाह व सेनापती होता. त्याने पाचवेळा भारतावर आक्रमणे केली. त्याने १७६१ साली पानिपताच्या तिसर्या युद्धात मराठ्यांना हरवले होते. मराठे व अब्दाली यांच्यात १७६१ पानिपतचे युद्ध झाले असले तरी हिंदुस्थानला अब्दालीचा हा पहिलाच परिचय होता असे नाही. या आधीही त्याने भारतावर चार स्वार्या केलेल्या होत्या.
इ. स. १७४७ मध्ये अफगाणिस्तानचा बादशहा नादीरशहाचा खून झाला. त्यामुळे त्याचा सेनापती अहमदशहा अब्दालीने सत्ता बळकावली. सत्तेवर येताच त्याने हिंदुस्थानातील राजकिय गोंधळाचा फायदा घेऊन जानेवरी १७४८ मध्ये हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. पंजाबचा मोगल सुभेदार शहानवाजखानाचा पराभव करून दिल्लीवर चाल केली. दिल्लीच्या बादशहाने (मंहमदशहा) त्याच्याविरूद्ध आपला मुलगा अहमदशहा वजीर कमरूद्दीन व मीरबक्षी सफदरजंग यांना पाठविले. २१ मार्च रोजी मनुपूर तेथे लढाई होऊन अब्दालीचा पराभव झाला पण वजीर कमरूद्दीन मारला गेला.
अब्दालीचा पराभव झाला असला तरी तो नष्ट झाला नव्हता. त्याने १७४९ मध्ये दुसरी स्वारी केली. पंजाबचा सुभेदार मीरमन्नुने वजीरबादजवळ अब्दालीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दिल्लीहून मदत न मिळाल्याने त्याने अब्दालीशी तह केला. त्यानुसार अब्दालीला पंजाबच्या उत्तरेकडील चार जिल्हे व १ लाख रूपये खंडणी मिळाली.
मोगल बादशहा अहमदशहा विरूद्ध वजीर सफदरजंग संघर्षाचा फायदा घेऊन अब्दालीने १७५१ मध्ये तिसरी स्वारी केली. यावेळी सफदरजंग, रोहिले व पठाणांशी लढण्यात मग्न होता व त्याला मराठ्यांनी मदत केली होती. अब्दाली पंजाबला येताच घाबरलेल्या बादशहाने वजीरला बोलावणे पाठवले. सफदरजंगनेही अब्दालीविरूद्ध मराठ्यांशी करार केला व शिंदे होळकरांना बरोबर घेऊन दिल्लीकडे निघाला. परंतु तो दिल्लीला पोहोचण्याआधीच बादशहाने अब्दालीशी तह करून पंजाब देऊन टाकला होता. दिल्लीतील अंतर्गत परिस्थिती विस्फोटक बनली होती. त्यामुळे अब्दालीने दिल्लीला आपला वकिल पाठवून ५० लाख रूपये खंडणीची मागणी केली. यावेळी वजीराने काही खंडणी देऊन अब्दालीपासून दिल्लीचे रक्षण केले.
नोव्हेंबर १७५६ मध्ये अब्दालीने चौथी स्वारी करून पंजाबमध्ये प्रवेश केला. त्याचा मुलगा तिमूरशहा व सेनापती जहानखान यांनी लाहोर जिंकून घेतल्याने संपूर्ण पंजाब अब्दालीच्या ताब्यात आला. यानंतर अब्दाली दिल्लीवर चालून गेला, यावेळी दिल्लीचा वजीर इमाद-उल-मुल्ककडे त्याने १ कोटी रूपयांची मागणी केली त्यास वजीराने नकार दिल्याने अब्दालीने दिल्लीत प्रचंड विध्वंस व अत्याचार केले. जवळजवळ १ महिना दिल्लीची लूट केल्यानंतर तो मथूरेकडे गेला. तेथील शेकडो देवालयांचा नाश केला, हजारो हिंदूंची कत्तल केली. या सर्व लुटीत अब्दालीला १२ कोटी रूपये मिळाले.
पानिपतच्या लढाईत मिळालेला विजय हा अब्दालीचा शेवटचा विजय ठरला. या लढाई नंतर मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४ एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला.

