अशेरीगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अशेरीगड
नाव अशेरीगड
उंची १७०० फुट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव खोडकोना
डोंगररांग पालघर
सध्याची अवस्था बऱ्यापैकी
स्थापना {{{स्थापना}}}


अशेरीगड हा पालघर जिल्ह्यातील गड आहे.

ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुका आजही गडकोटांनी समृद्ध असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. मुंबई- ठाणे शहरातील बहुतेक किल्ले आज नामशेष होण्याच्या मार्गावर असताना पालघर तालुक्यातील गडकोट मात्र लहान लहान डोंगररांगांवर अजूनही आपले अस्तित्व टिकवून बऱ्यापैकी अवस्थेत उभे आहेत.ठाणे जिल्ह्यातील पालघर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो.पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात ‘दादा’ असा वाटावा असा हा अशेरीगड. आकार प्रचंड असल्याने या गड बुलंद वाटतो.

ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात येणाऱ्या किल्ल्यांपैकी अशेरीगड किल्ल्याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो. किल्ल्याला अशिरगड असेही संबोधले जाते. इतिहास काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते.अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे १४व्या शतकात महिकावती नगरी (माहीम) येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इ. स. १५५६ साली अशेरीवर हल्ला करून तो बळकाविला. या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबुतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी इ. स. १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले. त्याच वेळी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून १७३७ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. १८१८ नंतर अशेरीगड इंग्रजांच्या हाती गेला.

पहाण्याची ठिकाणे[संपादन]

अशेरी गडाच्या पठारावर पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरे येथे आढळतात. बहुदा घरा भोवती साचणारे पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांची योजना केलेली असावी. गडावरची गुहा मध्यम आकाराची व रूंद तोंडाची आहे. परंतु ती खडकात अशा खुबीने खोदलेली आहे की भणाणणाऱ्या वाऱ्याला व थंडीला अजिबात प्रवेश मिळू नये. गुहेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे. मात्र इथे आत व बाहेर पहारेकऱ्यांना झोपण्यासाठी दगडी पलंग (बर्थ) केलेले आहेत. येथे गुहेच्या तोंडाशी दोन जास्वंदीची झाडे आहेत.गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडालेली तोफ दिसते. याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत. वरच्या पठारावरून आग्नेय दिशेकडे पाहिल्यास कोहोजगड स्पष्ट दिसतो. दुर्बिणीने त्यावरील निसर्गनिर्मित मानवी पुतळाही सहज निरखता येतो. याच दिशेने पुढे गेल्यास कड्याला गेलेली मोठी चीर व पुढे एक बांधीव बुरूज दिसतो. गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जण्यसठी एकच वाट आहे. पालघरहून कासा या शहराकडे जाणाऱ्या एस.टी. बसने किंवा या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनाने निघून ‘मस्तान नाका’ या ठिकाणापासून सुमारे १०-११ कि.मी. वर असणाऱ्या ‘खोडकोना’ गावाच्या स्टॉपला उतरायचे..खोडकोना म्हणजे अशेरी गडाच्या पायथ्याशी असलेल पाच-पंचवीस घर असलेल छोटस पण लोभस गाव. प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडे आत आहे. गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे. महामागावरूनच पालघरकडे पाठ करून उभे राहिल्यास उजवीकडे अडसूळ व डावीकडे प्रचंड असा अशेरीगड दिसतो. बैलगाडीची वाट ऐका सिमेंटच्या पुलावरून गावात शिरते. इथे वेशीवरच वाघदेवाचे छोटेसे परंतु टुमदार मंदिर आहे. आत गेल्यावर विस्तीर्ण पसरलेले आम्रवृक्ष, शेते व त्यातून डोकावणारी घरे प्रवासाचा शीण घालवताता. विहिरीच्या थंड पाण्याने आपल्या बाटल्या भरून गावकऱ्यांनी दाखवलेल्या वाटेने खिंडीकडे निघायंच. वाट जंगलातून जात असल्याने उन्हाळ्यातही त्रास होत नाही. साधारणतः खिंडीत पोहोचण्यास एक ते दीड तास लागतात. वाट इथपर्यंत सोपी पण चढणीची आहे. खिंडीत थोड्या वरच्या बाजूला वाघदेवाचे छोटे उघडे देऊळ आहे. खिंडीतून उजवीकडे वळून गडमाथ्याकडे निघायचं. इथे एका मोठ्या खडकाला वळसा घातल की आपण दरवाजाच्या खाली येतो. इथे दगडावर कोरलेली एक छोटी गणेशमूर्ती आहे. दरवाजा सुरूंगाने फोडलेला आहे. इथे मात्र वर चढतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रस्तर वेडेवाकडे असल्याने अनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने चढाई करणे योग्य. शक्यतो पाठीवरचे सामान उतरवूनच चढावे. इथून प्रस्तरारोहणाची हौस भागवून वर चढले की उजवीकडे वर जाण्यासाठी कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. वाटेत खराब पाण्याचे टाके लागते. या टाक्यावरूनच दुतर्फा खांद्यापर्यंत उंच झुडूपांतून गडाच्या मध्यापर्यंत जाणारी वाट आहे. या वाटेने जाताना डाव्या हाताला थोडे खाली खडकात पाच पाण्याची टाकी खोदलेली आहेत. यापैकी एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर ५ मिनिटांच्या अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते. तिने खाली गेल्यावर पाण्याची तीन आणखी टाकी आहेत. या टाक्यांतील अतिशय सुंदर आहे. जवळच खडकात एक गुहा देखील आहे.

प्रवेशद्वाराच्या माथ्यावरील गणेशपट्टी इथे पडलेली दिसते.आत शिरताच उठावदार दगडी मुकुट व त्याच्याखाली पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह दिसते. इथेच कातळात खोदलेले पाण्याचे टाकेही आहे. या टाक्याचे थंडगार पाणी चढाईचा थकवा क्षणार्धात घालवते. पुढे कातळात खोदलेल्या पायऱ्यांनी अशेरीगडाच्या दुसऱ्या भग्न दरवाज्यात पोहोचता येते. याच्या अवशेषावरून याची मूळ रचना लक्षात येते. अशीरगडाचा विस्तार उत्तर- दक्षिण पसरलेला असून याच्या माथ्यावरील जंगल आजही बऱ्यापैकी टिकून आहे. गडावर कातळात खोदलेली पाण्याची पाच टाकी लागतात. पुढे थोडे आणखी खाली उतल्यावर दरीच्या अगदी काठावर पाण्याने तुडुंब भरलेली, कातळात खोदलेली पाच टाकी लागतात. या पाचही टाक्यांचे पाणी पिण्यायोग्य आहे. यापुढची पायवाट थोडय़ा वेळात गडाच्या सर्वोच्च पठारावर घेऊन जाते. येथे पोहोचताच समोरच आपणास पडक्या वाडय़ाचे चौथरे दिसतात. विशेष म्हणजे, या चौथऱ्याच्या चारी बाजूंनी दगडी चर खोदलेला आहे. इतर गडावर फारसा कोठेही न आढळणाऱ्या या दगडी चराचे या ठिकाणचे प्रयोजन काय असेल या गोष्टीची उकल मात्र होत नाही.

येथून पुढे आपण दगडात खोदलेल्या गुहेत येऊन पोहोचतो. या गुहेच्या आतील बाजूस कातळावर अशेरी देवीचा तांदळा असून गुहेत चार लोक झोपतील एवढी जागा आहे. पुढे गडाच्या माथ्यावर कमलपुष्पांनी भरून गेलेला तलाव दिसतो. सह्य़ाद्रीतील किल्ल्यांवर शेकडो तलाव आहेत. पण कमलवेलीने सौंदर्य वाढवलेला हा एकमेव! गडाभोवती उभ्या कडय़ांमुळे तटबंदीची फारशी गरज भासली नाही.

अशेरीगडाची निर्मिती राजा भोजच्या कारकिर्दीत करण्यात आली. पुढे १४ व्या शतकात महिकावती नगरी (माहीम) येथील राजा िबबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इ. स. १५५६ साली अशेरीवर हल्ला करून तो बळकविला. या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबुतीकरिता अनेक नवीन बांधकामे बांधली. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी इ. स. १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले. त्याच वेळी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये विजरईने हा किल्ला जिंकून परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आणला. पुढे चिमाजी अप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठय़ांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ रोजी अशेरीगड जिंकून घेतला व परत मराठय़ांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले

चित्ते घराणे आणि अशेरीगड[संपादन]

गुजरात प्रांतामधुन सन १६३० साली(शिवरायांचा जन्म झाला त्याच वर्षी) नशिरुद्द्न बादशहा सोबत चित्ते घराणे अशेरीगड / अशिरगड येथे वास्तव्यास आले. इ. स. १६८३ साली संभाजी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यावर चित्ते घराणे पश्चिम खानदेश निमखेड (धुळे जिल्हा) येथे वास्तव्यास गेले. इ. स.१८३० साली चित्ते घराणे यावल येथे वास्तव्यास गेले तेथून इ. स. १९०१ साली चित्ते घराणे भुसावळ (जुना सातारा फाईल ) येथे वास्तव्यास गेले.

अशेरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.