अच्युत महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री संत अच्युत महाराज यांचा जन्म २७ जानेवारी १९२४ रोजी पौष वद्य षष्टीला झाला. शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत झाले होते. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांनी महाराजांनी मौन धारण केले व त्याच वर्षी कोजागिरी पौर्णिमेला (१६ ऑक्टोबर) त्यांनी गृहत्याग केला.

वयाच्या १७ व्या वर्षी घराबाहेर पडलेल्या अच्युत महाराजांचे १७ ऑक्टोबर १९४१ ला वरखेड येथे आगमन झाले. तीन दिवसांनी येथेच त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेशी पहिली भेट झाली. भेटीच्या दुसऱ्याच दिवशी महाराजांनी त्यांना तपश्‍चर्येचा मंत्र दिला. त्यानुसार परतोडच्या जंगलात १९५८पर्यंत अच्युत महाराजांनी तपसाधना केली. १९६१ साली महाशिवरात्रीला त्यांचा पहिला ग्रंथ ‘श्री पंचधारा स्रोत’ प्रकाशित झाला. नंतर कौंडण्यपूर येथील वास्तव्यादरम्यान तब्बल सात वर्ष त्यांनी विविध ग्रंथांचे लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाद्वारे व लोकांसमोर दिलेल्या प्रवचनांमधून त्यांनी पुष्कळ समाजप्रबोधन केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत श्री संत अच्युत महाराज

कार्य[संपादन]

  • गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले.
  • २४ नोव्हेंबर १९७८ रोजी महाराजांना महाराष्ट्र योग संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले. योगसाधनेची त्यांच्यात असलेली अफाट सिद्धता लोकांपुढे मांडणारा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम होता.
  • १९८१ साली त्यांनी नागपूर विद्यापीठात गाडगीळ व्याख्यानमालेला उपस्थित राहून पहिले प्रवचन केले.
  • १९८५ साली त्यांनी अच्युत धर्मग्रंथ प्रकाशन संस्थेची स्थापना केली.
  • १९८७मध्ये साने गुरुजी मानव सेवा संघ स्थापन केला. याच सेवासंघाच्या रोपट्याचे आज अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल या नावाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे. येथे ९00 हून अधिक हृदयशस्त्रक्रिया झाल्या आहेत. ८ डिसेंबर २००२ रोजी याच रुग्णालयात प्रथम हृदयरोगनिदान व तपासणी शिबिर घेण्यात आले होते. तर ७ जुलै २००६ रोजी मुंबईच्या डॉ. रत्ना मगोत्रा यांनी या हॉस्पिटलमध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी केली. अमरावती विभागाच्या इतिहासातली ती पहिली शल्यक्रिया होती. त्यानंतर ४ सप्टेंबर २००६ साली अधीक्षक डॉ. अशोक भोयर यांनी या हॉस्पिटलमध्ये पहिली शस्त्रक्रिया केली. डॉ. भोयर यांचा तो क्रम आजही सुरू आहे. हृदयरुग्णांवर उपचार तर होतात. मात्र औषधांसाठी त्यांना भटकावे लागू नये म्हणून २ जून २००७ रोजी याच हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर्सही उघडण्यात आले. त्याच महिन्यात सदर हॉस्पिटलला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधी’ ची मान्यता मिळाली. २९ जुलै २००७ ला गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांनी त्यांच्याकडे जमा झालेले ५५ लाख रुपये या हॉस्पिटलला दिले. १२ ऑगस्ट २००८ रोजी या हॉस्पिटलला राज्य शासनाने मान्यता देऊन कर्मचाऱ्यांसाठी नवी सोय उपलब्ध करून दिली.
  • अच्युत महाराज त्यांच्यापाशी जमा झालेल्या साहाय्य निधीतून तपोवन येथील अनाथ बालकाश्रमसही मदत करत असत.
  • अच्युत महाराजांनी काही संस्कृत ग्रंथाचा मराठीत ओवीबद्ध अनुवाद केला आणि हिंदी व मराठी भजनमाला रचल्या.

अच्युत महाराजांनी ओवीबद्ध केलेले ग्रंथ[संपादन]

  • अध्यात्म रामायण
  • दुर्गा सप्तशती
  • श्रीमद्‌भागवत
  • महाभारत
  • शिवमहिमा स्तोत्र

त्यांचे अन्य ग्रंथ[संपादन]

  • खेड्यातील माणसे
  • गीता ग्रामगीता
  • ग्रामगीता तत्त्वसार
  • संस्कार-पाठ

असे सुमारे शंभर ग्रंथ त्यांनी लिहिले.

अच्युत महाराज यांचे निधन दि. ७ सप्टेंबर २०१२ रोजी झाले; त्यांची समाधी अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार येथे आहे.